प्रक्रिया न केलेले सांडपाणी पंचगंगेत सोडू नका - शेट्टी

प्रक्रिया न केलेले सांडपाणी  पंचगंगेत सोडू नका - शेट्टी

कोल्हापूर - ‘‘सांडपाणी व्यवस्थापनासाठी महापालिकेला निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे महापालिकेने बंद करावे,’’ अशा सूचना खासदार राजू शेट्टी यांनी केल्या.

जिल्हा विकास समन्वय संनियंत्रण समितीची सभा खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली महाराणी ताराराणी सभागृहात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी या समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, प्रकल्प संचालक (ग्रामीण विकास यंत्रणा) हरीश जगताप, सचिन पाणारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘पंचगंगा नदीकाठावरील गावांना कावीळ, गॅस्ट्रोसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होत असतो. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिकेने पंचगंगा नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडणे बंद करावे.’’ त्यांनी दुधाळी व जयंती नाला येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचीही सविस्तर माहिती घेतली.

केंद्र सरकार पुरस्कृत विविध योजनांतर्गत झालेल्या उद्दिष्टपूर्तीचा आढावा खासदार शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ते म्हणाले, ‘‘तळागाळातील तसेच ग्रामीण भागातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत असते. या योजनांचा लाभ संबंधित घटकांना मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने आणि काटेकोर प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.’’

या बैठकीत जिल्ह्यातील शाळांना १८३ खोल्यांची नव्याने मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेंतर्गत डिसेंबरअखेर ५९२ अर्ज, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेंतर्गत सात अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

‘‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया व देना बॅंक या राष्ट्रीयीकृत बॅंका लाभार्थींचे खाते झिरो बॅलन्सवर उघडण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी काही सदस्यांनी केल्याने यापूर्वीही या बॅंकांना याबाबत सूचना करण्यात आल्या असून, प्रतिसाद देत नसल्यास त्यांची तक्रार रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे करण्यात येईल,’’ असे खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले. कागल पालिकेत पंतप्रधान आवास योजनेत (शहरी) झालेल्या कामांचे ऑडिट करून एक महिन्यात अहवाल सादर करावा. या योजनेतील उर्वरित ४०० घरे पूर्ण करण्याचे काम येत्या तीन ते चार वर्षांत करण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी या वेळी सूचित केले.

भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करा - खासदार महाडिक 
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘कुत्रे चावून रेबीज होण्याच्या घटना वाढत आहेत. भटक्‍या कुत्र्यांना आवार घालण्याबाबत कोल्हापूर महापालिका कोणत्या उपाययोजना करीत आहे? ‘सीपीआर’कडे रेबीज प्रतिबंधक लसींचा किती साठा उपलब्ध आहे?’’ त्यावर जिल्ह्यात तीन हजार ७४२ रेबीज प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.

श्री. महाडिक म्हणाले, ‘‘टाकाळ्यावरील जलतरण तलावाची गळती अद्याप निघालेली नाही. ती काढण्याबाबत महापालिकेने उपाययोजना करावी. रंकाळा तलावाशेजारील अंबाई जलतरण तलावाचे नूतनीकरणाचे काम मार्गी लावावे. संसद आदर्श ग्राममधील विविध विकासकामांसाठी शासनाकडून आवश्‍यक निधी प्राधान्याने उपलब्ध होणे आवश्‍यक आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com