साखर उद्योग अडचणीत येण्यास केंद्राचे धोरणच कारणीभूत - पृथ्वीराज चव्हाण

साखर उद्योग अडचणीत येण्यास केंद्राचे धोरणच कारणीभूत - पृथ्वीराज चव्हाण

गडहिंग्लज - देशातील साखर उद्योग अडचणीत येण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचित्र मानसिकता व तत्वज्ञान कारणीभूत आहे. या उद्योगावर अवलंबून असलेल्यांपेक्षा साखर खाणाऱ्या ग्राहकांची टक्केवारी मोठी आहे. यामुळे केंद्राचे साखर धोरण या ग्राहकांकडे पाहून ठरवले जात आहे. उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला मात्र झीरो किंमत मिळत आहे. ग्राहकांना खूष ठेवण्यासाठीच ऊस उत्पादकांवर संक्रांत आणण्याचे धोरण केंद्र सरकार राबवत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.

एका कार्यक्रमानिमित्त श्री. चव्हाण ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "" कोणत्याही प्रश्‍नावर शेतकरी संघटीत होत नाही, हे मोदींना समजले आहे. यामुळे ते नेहमी भांडवलदार व ग्राहकांना नजरेसमोर ठेवून शेतीमालाविषयी धोरण ठरवित आहेत. साखर उद्योगाबाबतही हाच अनुभव येत आहे. मोदींच्या मते साखर खाणारा ग्राहक हा साखर कामगार, तोडणी-ओढणी यंत्रणा व शेतकऱ्यांपेक्षा अधिक टक्केवारीने आहे. यामुळे दोन - चार टक्के घटकांसाठी 90 टक्‍क्‍यावरील ग्राहकांना नाराज करायचे नाही ही त्यांची मानसिकता तयार झाली आहे. केवळ साखरच नव्हे तर प्रत्येक शेतमालाबाबत त्यांची अशीच भूमिका राहिली आहे. म्हणूनच देशात कोणत्याही शेतमालाला समाधानकारक भाव नाही. शेतमालाला किमान भाव देण्याची जबाबदारी व उत्तर देण्याचे दायित्व सरकारचे आहे. ग्राहक, शेतकरी व साखर उद्योग या घटकांना समान न्याय देत सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न सरकारने करायला हवा. ग्राहकांना खूष करण्याचे केंद्राचे धोरणच आज महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कृषी क्षेत्रावर संकट येण्यामागचे मुख्य कारण आहे."" 

तोटा भरण्यासाठी महागाई
श्री. चव्हाण म्हणाले, ""नोटाबांदी व जीएसटीच्या कार्यवाहीमुळे झालेला तोटा भरून काढण्यासाठी विविध करांचा भार वाढवून इंधन दरवाढीला खतपाणी घालत आहे. इंधनाचे मूळ दरात घसरण होवूनही देशात त्याचे भाव वाढत आहेत. या माध्यमातून सरकारला वर्षात दहा लाख कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. तिजोरी भरण्यासाठी सर्वसामान्यांना वेठीला धरण्याचे काम भाजपा सरकार करत आहे.""

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com