पंचगंगेवरील शिवाजी पूल कमकुवत असल्याचा अभिप्राय

पंचगंगेवरील शिवाजी पूल कमकुवत असल्याचा अभिप्राय

कोल्हापूर - कोल्हापूरला कोकणशी जोडणारा पंचगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन शिवाजी पूल कमकुवत झाला असून या पुलावरून वाहतूक सुरू ठेवणे सद्य:स्थितीत धोकादायकच असल्याचा अभिप्राय या पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केलेल्या कंपनीने अहवालात नमूद केला आहे. यासंदर्भातील प्राथमिक अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे कार्यालयाला आज सादर झाला आहे. 

शिवाजी पुलाच्या कठड्याला धडक देऊन प्रवासी वाहतूक करणारी टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळून झालेल्या अपघातात १३ जण ठार झाले आहेत. ही घटना २६ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. या घटनेची गंभीर दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्याचे आदेश दिले होते. हे काम मुंबईच्या ध्रुव कन्स्ट्रक्‍शन कंपनीला देण्यात आले होते. या कामासाठी पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक चार-पाच दिवस बंद ठेवण्यात आली होती. 

पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचे काम ८ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले. यात पुलाच्या तीन प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यात पुलाची ‘एन्डोस्कोपी’, ‘जीपीआर’ व कमानीचा आकार व्यवस्थित आहे का नाही, याची तपासणी करण्यात आली. ‘एन्डोस्कोपी’त पुलाच्या कमानीखालील दगडांच्या सांध्यात कॅमेरा सोडून आतील रचना तपासण्यात आली. त्याचे फोटो संकलित करण्यात आले. त्यानंतर ‘जीपीआर’ तपासणीत पुलाच्या कमानीचा वरचा भाग व रस्ता यांच्यामधील थरांची तपासणी करण्यात आली. त्याचेही फोटो संकलित करण्यात आले. या सर्व तपासणीत संकलित केलेल्या फोटो व मातीच्या नमुन्यांची तपासणी पुण्याच्या प्रयोगशाळेत करण्यात आली. ध्रुव कन्स्ट्रक्‍शनच्या वतीने हे काम पुण्यातील ‘स्ट्रक्‍चवेल’ या कंपनीने केले. 

गेले दहा दिवस प्रयोगशाळेत ही तपासणी सुरू होती; तेव्हापासून पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. या ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वाहतुकीबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येणार होता. पण दहावी-बारावीची परीक्षा सुरू झाल्याने आजपासूनच पुलावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तोपर्यंत आज सायंकाळी ऑडिट केलेल्या कंपनीने पूल कुमकवत झाल्याने त्यावरील वाहतूक धोकादायक असल्याचा अभिप्राय प्राथमिक अहवालाद्वारे सादर केला. 

हा पूल ब्रिटिशकालीन आहे. त्याची दुरुस्ती करायची झाल्यास त्यासाठीची यंत्रणा वेगळी आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत पुलावरून वाहतूक सुरू ठेवणे धोकायदायक असल्याचे मत या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुलाच्या तपासणीचा आज सादर केलेला हा प्राथमिक अहवाल आहे. अजून सविस्तर अहवाल येत्या दोन-तीन दिवसांत सादर होईल, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

पर्यायी पुलाचे महत्त्व अधोरेखित
शिवाजी पूल कमकुवत झाल्याने त्यावरील वाहतूक धोकादायक असल्याचा अभिप्राय दिल्याने पर्यायी पुलाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून पर्यायी पुलाचे काम रखडले आहे. पुरातत्त्व विभागाच्या परवानगीअभावी हे काम सुरू झालेले नाही. या कामाची तीन कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध होऊन हे काम पुण्याच्या एका कंपनीला दिले आहे. पुरातत्त्व विभागाच्या परवानगीसाठी केंद्र सरकारने कायद्यात बदली केला आहे; पण प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com