‘त्या’ तरुणांना वकील मिळणार

‘त्या’ तरुणांना वकील मिळणार

कोल्हापूर - मलेशियातील तुरुंगात असलेल्या चार तरुणांसाठी भारत सरकारकडून तातडीने वकील देणे अद्याप तरी शक्‍य झालेले नाही. परिणामी पर्यायी व्यवस्था म्हणून नातेवाईकांच्या माध्यमातून आणि तरुणांना सहकार्य करणाऱ्या टीमकडून वकील देण्याचा निर्णय आज झाला. न्यायालयात काय बाजू मांडायची याबाबत परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनीही संबंधितांना मार्गदर्शन केले आहे.

दरम्यान काल दूतावासमध्ये दाखल झालेल्या कोल्हापूरसह कराड, अक्कलकोट, इंदापूर, कुर्डुवाडी येथील पाच तरुणांना महाराष्ट्रात पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मलेशियाकडून त्यांचा ताबा भारतीय दूतावासाकडे देण्यात आल्यामुळे त्यांना देश सोडविण्यासाठी आवश्‍यक असल्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे समजते. साधारण पुढील आठवड्यात या तरुणांना मायदेशी पाठविले जाण्याची शक्‍यता आहे. कर्जत (जि. नगर), अक्कलकोट, मानेवाडी (मंगळवेढा) आणि जळगावमधील तरुणांचा ‘वर्किंग व्हिसा’ संपल्यामुळे मलेशियात अटक करून तरुंगात ठेवले. त्यांना सोडविण्यासाठी भारत सरकारकडून परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे प्रयत्न करीत आहेत. चारही तरुणांना १२ डिसेंबरला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी भारत सरकारकडून तेथे वकील देणे आवश्‍यक होते; मात्र तांत्रिक बाबींमुळे हे वेळेत शक्‍य होत नाही. परिणामी नातेवाईक आणि मलेशियातील काही भारतीय तरुणांनी येथे पुढाकार घेऊन वकील देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज वकील निश्‍चित केले असून त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली आहे. श्री. मुळे यांनीही न्यायालयात काय मुद्दे मांडायचे, हे सांगितले आहे. या तरुणांकडून कळत नकळत गुन्हा झालेला आहे. ते शोषित असून त्यांना मायदेशी परत पाठविण्याची जबाबदारी घेऊन सोडण्याची विनंती केली जाणार आहे. येत्या मंगळवारी (ता. १२) न्यायालयात होणाऱ्या युक्तिवादानंतर चार तरुणांबाबत निर्णय होईल; तोपर्यंत केवळ वाट पाहण्याशिवाय नातेवाईकांकडे पर्याय उरलेला नाही.

एजंटांनी फसवणूक करून तरुणांना पगार दिलेला नाही. पासपोर्टही काढून घेतला आहे. यानंतर त्यांना केव्हाही अटक होऊ शकते. म्हणून पाच तरुण मलेशियातील भारतीय दूतावासात स्वतःहून  हजर झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर, कराड, अक्कलकोट व कुर्डुवाडी (जि. सोलापूर) आणि इंदापूर (जि. पुणे) येथील तरुणांचा समावेश आहे. या तरुणांची राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था दूतावासने केलेली आहे. तेथे सर्व तरुण सुरक्षित आहेत. त्यांना मायदेशी पाठविण्याची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झालेली आहे. दूतावासला आज सुटी असल्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
महाराष्ट्रातील तरुण मलेशियात अटकेत आहेत. काहींची फसवणूक झाली आहे. एकूण नऊपेक्षा अधिक तरुण मलेशियात अडकले आहेत. त्यांना सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील एकही नेता पुढे येत नाही. एकाही खासदाराने याबाबत सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली नाही. किमान हिवाळी अधिवेशनात याबाबत आमदार आणि खासदार आवाज उठवणार काय, असा सवाल नातेवाईकांकडून उपस्थित होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com