कोल्हापूर - 'क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्स'च्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील निवडक व विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उद्या (ता. 19) महागोलमेज परिषद होत आहे. मार्केट यार्ड येथील मुस्कान लॉनमध्ये सकाळी साडे दहा वाजता परिषदेस सुरवात होईल. परिषदेत सुमारे चारशे ते पाचशे निमंत्रक सहभागी होणार आहेत.
मराठा क्रांती मूक महामोर्चाच्या निमित्ताने सकल मराठा समाज एकत्र आला. राज्यातील विविध ठिकाणचे मोर्चे यशस्वी झाल्यानंतर समाजाच्या प्रालंबित प्रश्नांवर पुन्हा चर्चा झाली.
समाजाला दिशा देण्यासाठी नेमकेपणाने काय करावे, यावर विचारविनिमय झाला. कृतिशील कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी आजपर्यंत महामोर्चाचे यशस्वी नियोजन केलेल्या मावळ्यांना परिषदेसाठी निमंत्रित केले आहे.
परिषदेत शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीमालास हमीभाव, कर्जमाफी यावर चर्चा केली जाणार असून, सोशल मीडियाची आचारसंहिता एकमताने ठरविली जाणार आहे. हुंडाबळी रोखण्यासाठी हुंडा नको, विद्यार्थ्यांची शुल्कमाफी यासंदर्भात ठराव केला जाणार आहे. तसेच ऍट्रॉसिटीचे खोटे निर्णय रोखावेत व कोपर्डीसारखे अत्याचार रोखण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासह "सारथी'चे केंद्र कोल्हापुरात व्हावे, यासाठी ठराव केला जाणार आहे.
|