बलवडीचे येरळा पात्र पानगवताने वेढले

बलवडीचे येरळा पात्र पानगवताने वेढले

आळसंद : बलवडी भा. (ता. खानापूर) येथील येरळेचे पात्र पानगवताने वेढले आहे. पाण्याअभावी येरळा कोरडी ठणठणीत पडली आहे. दरवर्षी पात्रात मोठ्या प्रमाणात पानगवत उगवते. त्यामुळे पाणी दूषित होऊन त्याला दुर्गंधी येते. लोकसहभागातून येरळेची स्वच्छता केल्यास येरळा दुर्गंधीमुक्त होईल. त्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन येरळा स्वच्छतेची मोहीम राबवावी, अशी मागणी येरळाकाठच्या शेतकऱ्यांतून होत आहे. 

खानापूर तालुक्‍यातील अग्रणीनदी व वाळवा तालुक्‍यातील तीळगंगा नदी पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण शासन व लोकसहभागातून करण्यात आले. त्याच पद्धतीने बलवडीतील येरळापात्राची स्वच्छता केल्यास पाणी स्वच्छ राहील. येरळाकाठावर बलवडी, तांदळगाव, कमळापूर, भाळवणी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्राबरोबर भाजीपाला क्षेत्र शेतकऱ्यांनी केले आहे.

येरळा पात्रात ताकारी, आरफळ योजनेचे पाणी सोडले जाते. पात्रात ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे सिमेंट बंधारे आहेत. त्यामुळे येरळेत बारमाही पाणी असते. शिवाय बलवडी- तांदळगावच्या दरम्यान येरळेवर बळीराजा धरण आहे. त्यामुळे पात्रात मोठा पाणीसाठा असतो. पात्रात गाळ साठल्याने पानगवत मोठ्या प्रमाणात उगवते. गवतामुळे पाणी दूषित होते. पानगवतामुळे पात्र अरुंद बनत आहे.

दरम्यान, बलवडी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना पात्राची सीमा निश्‍चित करून द्यावी, यासाठी पत्र दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी येरळेला भेट देऊन सीमा निश्‍चित करून द्यावी. त्यानंतर लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविणे सोयीस्कर जाईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com