मोडनिंब - रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष, माढा तालुक्याचे माजी आमदार, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते संपतराव मारुती पाटील ऊर्फ भाई एस. एम. पाटील (वय 89) यांचे आज पुणे येथे निधन झाले. पंधरा दिवसांपासून पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी दुपारी 12 वाजून 19 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
विधानसभा, जिल्हा परिषदेतील पाटील यांची अनेक भाषणे गाजली. ते फर्डे वक्ते होते. रयत शिक्षण संस्थेचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविणाऱ्या कर्मवीर आण्णांच्या नंतरच्या फळीतील ते आघाडीचे नेते होते. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे 50 वर्षे संचालक म्हणून, तर काही वर्षे व्हाइस चेअरमन म्हणून पाटील यांनी काम पाहिले. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता. सेवादलातही त्यांनी काम केले. स्वातंत्र्यानंतर ते शेतकरी कामगार पक्षात सक्रिय झाले.
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी, पाण्याच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या पिकाला उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळावी, यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. सोलापूर जिल्ह्यात भाई एस. एम. तात्या या नावाने ते परिचित होते. त्यांच्या पश्चात भाऊ, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ऍड. बाळासाहेब पाटील, जलतज्ज्ञ अनिल पाटील यांचे ते वडील होत. "सकाळ'चे बातमीदार संतोष पाटील यांचे ते चुलते होत.
|