नगर - कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींनी थंड डोक्याने नव्हे, तर गोठलेल्या रक्ताने पीडित मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला. त्यामुळे तिन्ही आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी केला. आरोपींच्या शिक्षेबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर या खटल्याच्या निकालासाठी न्यायालयाने 29 नोव्हेंबर ही तारीख ठेवण्याचा आदेश दिला.
जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25, कोपर्डी, ता. कर्जत), संतोष गोरख भवाळ (वय 30, मूळ. खांडवी, हल्ली कोपर्डी) व नितीन गोपीनाथ भैलुमे (वय 26, कोपर्डी) अशी दोषी ठरविलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर आज सरकारी पक्ष व आरोपी संतोष भवाळ याच्या शिक्षेबाबत युक्तिवाद पूर्ण झाला. भवाळ याच्यातर्फे ऍड. बाळासाहेब खोपडे व ऍड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी बाजू मांडली. या खटल्यातील पुरावे संशयास्पद असून, सामाजिक अथवा माध्यमांच्या दबावाच्या आधारे आरोपीला शिक्षा होऊ नये, असे म्हणणे त्यांनी मांडले.
ऍड. निकम यांनी तिन्ही आरोपींना जास्तीत जास्त म्हणजे फाशीची शिक्षा देण्यासाठी गुन्ह्यातील 13 महत्त्वाची कारणे न्यायालयासमोर मांडली. ते म्हणाले, की आरोपींनी कट रचून पीडित मुलीवर अत्याचार करून खून केला. त्यासाठी सबळ परिस्थितीजन्य पुरावे आहेत. गुन्हा करणाऱ्यांबरोबरच कटात सहभागी असलेलेही तेवढेच दोषी असल्याचे त्यांनी न्यायालयासमोर मांडले.
|