नगर - 'शक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच गुणवत्तेची स्पर्धा निर्माण झाली आहे. जे शिक्षक चांगले शिकवितात, तिकडे मुले जातात. गुणवत्ता नसलेल्या शाळा बंदच होणार. त्यात सरकार दोषी नाही. राज्य सरकारने अशा 1300 शाळा नुकत्याच बंद केल्या आहेत,'' अशी माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शुक्रवारी दिली.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आज आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी विद्या प्राधिकरणाचे संचालक सुनील पवार, प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक सुनील चौहान आदी उपस्थित होते. नंदकुमार म्हणाले, 'काही शिक्षकांनी राबविलेले उपक्रम सादर केले. मात्र, एका सादरीकरणाच्या वेळी मला झोपही लागली. आपण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बसलो आहोत. नाटके करण्यासाठी नाही.''
'बैठकीत मला शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या टक्केवारीत सांगितली. मात्र, शिकू न शकलेल्या मुलांची संख्या हजारांच्या घरात असेल. तुमची मुले शिकली नाहीत, तर कसे वाटेल? एक मूल मागे राहिले, तर एक कुटुंब मागे राहते. आपण शंभर टक्के मुलांच्या शिक्षणासाठी पगार घेतो. मुले न शिकल्यास तुम्हाला अडचणी येतील. ही मुले शिकली, तर आपोआप तुमचा पगार वाढेल. संप करून तुम्ही न कमाविलेले पगार घेणार आहात का,'' असा सवालही त्यांनी केला.
चमचेगिरी नको, कामे करा!
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार म्हणाले, 'काही शिक्षकांनी त्यांच्या उपक्रमाची माहिती देण्यापूर्वी मार्गदर्शक म्हणून माझा फोटो दाखविला. नंदकुमारला चमचेगिरी अथवा स्तुतीची गरज नाही. चांगल्या कामाची गरज आहे.''
|