सोलापूर - शेकडो एकर जमीन असूनही उत्पादित माल नेण्याकरिता रस्ता नसतो. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर भांडण करण्यातच वर्षानुवर्षे निघून जातात. हा वाद कालांतराने पोलिस ठाण्यापर्यंत जातो. त्यावर आता राज्य सरकारने उपाय शोधला असून, सरपंचांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहेत. त्यांच्या माध्यमातूनच गावातील रस्त्यांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत. जेणेकरून गावगाड्याचा कारभार सुधारून विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
शेतीला रस्ता नसल्याने पेरणी, मशागत, पिकांची कापणी वेळेवर होत नाही. नाशवंत कृषी उत्पादने, फळे भाजीपाला वेळेत बाजारात नेता येत नसल्याने नुकसान होते. सर्पदंश, वीज पडणे, पूर येणे, आग लागणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींवर तत्काळ मात करणे वेळेत शक्य होत नाही. त्यामुळे जिवित व वित्तहानी होते. रस्त्याच्या वादाला कंटाळून शेती विकावी लागते. तसेच रस्त्याच्या वादामुळे पोलिस स्टेशन, कोर्ट कचेऱ्यात वेळ जातो आणि त्यामुळे गावात अशांतता निर्माण होते. त्यावर आता या नव्या निर्णयामुळे तोडगा निघणार आहे.
शिवरस्ता, ग्रामीण गाडीमार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याकरिताचे मार्ग याबाबत आता गावस्तरीय समितीद्वारे गावातच तोडगा निघण्याची आशा आहे. त्यामुळे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि गावात शांतता निर्माण होईल.
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
गाव रस्ता समिती
सरपंच (अध्यक्ष), तलाठी (सदस्य सचिव), मंडल अधिकारी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, विकास सोसायटीचे अध्यक्ष, प्रगतिशील शेतकरी, एक महिला ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कृषी सहायक, बीट जमादार, पोलिस पाटील (सदस्य).
|