सांगली - राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी नसून कर्जवसुली अभियान असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या विरोधात सुकाणू समितीतर्फे राज्यभर जनजागृती अभियान 10 ते 23 जुलै दरम्यान राज्यभर राबवण्यात येणार आहे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मेळावा 22 जुलै रोजी कोल्हापूर येथील मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक भवनात दुपारी एक वाजता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुकाणू समितीत शेकाप, डावे पक्ष, स्वाभिमानीसह सर्व शेतकरी संघटना, आमदार बच्चू कडू यांच्यासह अनेक संघटनांचा समावेश आहे. त्यांच्याकडून राज्यभर जनजागृती आंदोलन सुरू केले आहे. पाटील म्हणाले,""शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीवर राज्यभरातून नाराजी व्यक्त होत आहे. राज्यातील शेतकरी आंदोलनाचे देशभर पडसाद उमटू लागल्याने कर्जमाफीला तयार नसलेले मुख्यमंत्री कर्जमाफीला तयार झाले. प्रत्यक्षात त्यातील अटीमुळे किती जणांना कर्जमाफी मिळणार असा प्रश्न आहे. दहा हजार रुपये तातडीने कर्ज कोणालाही मिळालेले नाही.''
ते म्हणाले, 'राज्य शासनाने तूर खरेदी केली त्यांचे दोन महिने झाले तरी पैसे दिले नाहीत. खरे तर 24 तासांत पैसे द्यायला हवेत. यामुळे हळद, बेदाणा आणि अन्य खरेदीदार व्यापारी शेतकऱ्यांचे विलबांने पैसे देत आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाल्याशिवाय शेतकरी कर्जातून मुक्त होणार नाही.''
'दीड लाख रुपये कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना जूनअखेर अन्य कर्ज भरण्याचे आदेश दिले. याचा अर्थ असा निघतो की, ही कर्जमाफी नसून, कर्जवसुली अभियान आहे. शेतकऱ्यांकडे पैसे असते तर त्यांनी कर्जे काढली नसती. आता सरकारने मुदतवाढ दिल्याचे सांगितले आहे. ही कर्जमाफीच फसवी आहे.''
- रघुनाथदादा पाटील, नेते शेतकरी संघटना.
जनजागृती मेळावा कार्यक्रम:
नाशिक (10 जुलै), ठाणे, पालघर (11 जुलै), रायगड (12 जुलै), नगर (13), धुळे, नंदुरबार, जळगाव (14), बुलढाणा, अकोला, नाशिक (15), अमरावती (16), वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया (17), नांदेड (18), औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी (19), बीड (20), सोलापूर, उस्मानाबाद (21), सांगली, कोल्हापूर (22) आणि पुणे, सातारा (23).
|