सांगली - गेल्या साठ वर्षांत शहरांच्या वाढ आणि नियोजनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याच वेळी ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे वाढते लोंढे शहरांपुढच्या समस्या अधिक बिकट होत असून त्याची उत्तरे नव्या अभियंत्यांना शोधावी लागतील, असे मत हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केले.
स्वायत्त वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सातव्या पदवीदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे प्रमुख पाहुणे होते. या वेळी खासदार संजय पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बी.टेक.च्या 432 विद्यार्थ्यांना तर एम.टेक.च्या 217 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
गुलाबचंद म्हणाले, 'खेड्यांबद्दलच्या रोमॅन्टिसिझममध्ये खूप मोठा कालखंड लोटला. त्याच वेळी शहरे मात्र झपाट्याने विस्तारत होती. आजच्याइतके जग कधीही पूर्वी समृद्ध नव्हते आणि अस्थिरही. पुढच्या दशकभरात 30 लाख रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि कित्येक पारपंरिक रोजगाराचे स्रोतच संपतील. ही आव्हानेच पुढच्या संधी असतील. तंत्रज्ञानासह पुढची शहरे अनेक नव्या समस्यांना सोबत घेऊन वाटचाल करतील. त्यांची सोडवून करणे अभियंत्यासमोरचे आव्हान असेल.''
|