सांगली जिल्ह्यातील ५४३ ग्रामपंचायतीत निवडणूका

सांगली जिल्ह्यातील ५४३ ग्रामपंचायतीत निवडणूका

सांगली -  नवरात्रोत्सवासाठी घटस्थापना झाल्यानंतर जिल्ह्यातील ५४३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २२ सप्टेंबरपासून घट बसवला जाईल. शुक्रवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होईल. १६ ऑक्‍टोबर रोजी मतदान आणि १७ रोजी धनत्रयोदशीला निकालाचा फटाका फुटणार आहे. 

नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागली आहे. ६९९ पैकी ४५३ गावांत दसरा-दिवाळी सणातच निवडणुकीचा फड रंगणार आहे. निम्म्यापेक्षा जास्त गावात निवडणूक लागल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. ग्रामपंचायतीसाठी यंदा प्रथमच थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे अधिकार सरपंच आणि ग्रामसेवक यांना संयुक्तपणे दिले आहेत. सरपंचांच्या अधिकारात वाढ झाल्यामुळे या पदाला चांगलाच मान प्राप्त झाला आहे. आता तर थेट सरपंचपदाची संधी असल्यामुळे अनेकांनी शड्डू ठोकला आहे.

नवरात्रोत्सवाची घटस्थापना गुरुवारी झाली. आता ग्रामपंचायतीमध्ये आपापला पक्ष, गट आणि आघाडीची स्थापना करण्यासाठी शुक्रवारपासून अर्ज दाखल केले जातील. एकप्रकारे घट बसवण्यासाठी गावपातळीवर अनेकांनी कंबर कसली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी २२ ते २९ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. छाननी ३ ऑक्‍टोबर रोजी, अर्ज माघार घेण्याची तारीख ५ ऑक्‍टोबर आहे. याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होऊन चिन्हांचे वाटप केले जाईल. मतदान १६ ऑक्‍टोबर रोजी होईल. तर दिवाळीत धनत्रयोदशीला निकालाचा फटाका फुटणार आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात डबल दिवाळीचा धमाका दिसून येईल. थेट सरपंचपदासाठी एक आणि वॉर्डातील उमदेवार यांना ‘ईव्हीएम’ मशिनवर मतदान करावे लागेल. एकाच ईव्हीएम मशिनवर सरपंच, उमेदवार यांना मतदान करण्यासाठी बटन दाबावे लागेल. एका मशिनवर पंधरा उमेदवार असतील. त्यापेक्षा अधिक संख्या झाल्यास  दुसरे मतदान मशीन जोडले जाईल.
 

पोलिसांची दिवाळी बंदोबस्तात
यंदा ग्रामपंचायत निवडणूक दसऱ्यात सुरू होऊन दिवाळीत संपणार आहे. मतदान १६ रोजी होईल. तर निकाल दिवाळीत धनत्रयोदशीला लागणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवस अगोदर निकालाचे फटाके फोडले जातील. त्यामुळे संवेदनशील गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागेल. निकालानंतर धुसफूस आणि तणाव राहील. त्यामुळे पोलिसांची दिवाळी यंदा बंदोबस्तात जाईल, असे चित्र आहे.

४५३ गावांत धुमशांन
मिरज तालुका (३८ गावे), शिराळा (६०), वाळवा (७८), पलूस (१६), कडेगाव (४३), वाळवा (८८), तासगाव (२६), कवठेमहांकाळ (२९), खानापूर (४६), आटपाडी (२६) याप्रमाणे ४५३ गावात निवडणूक लागली आहे.

थेट सरपंचमुळे चुरस
आतापर्यंत निवडून आलेल्या सदस्यांमधून आरक्षणाप्रमाणे सरपंच निवडला जात असे. परंतु आता थेट जनतेतून सरपंच निवडला जाईल. त्यासाठी आरक्षण असणार आहे. त्यामुळे संबंधित आरक्षणातील इच्छुकांना थेट सरपंच होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. अनेकांनी चाचपणी करून इरादा स्पष्ट केला आहे. थेट सरपंचपदामुळे यंदा सर्वत्रच चुरस निर्माण झाली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com