जत पालिकेसाठी टाईट फिल्डिंग

जत पालिकेसाठी टाईट फिल्डिंग

जत - जत नगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी विक्रम सावंत तयारीला लागले आहेत. आमदार विलासराव जगताप यांनी शहरात प्रथमच कमळ फुलविण्यासाठी टाईट फिल्डिंग लावली आहे. शिलेदार सोडून गेल्याने शहरावरील पकड मजबूत करण्याचे आव्हान राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांच्यासमोर आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने वर्चस्वाची चढाओढ रंगणार आहे.
पालिकेची दुसरी निवडणूक आहे. ग्रामपंचायत असताना अनेक वर्षे सुरेश शिंदे यांचे वर्चस्व होते. मात्र, पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोडीमुळे त्यांना फटका बसला अन्‌ शहराच्या राजकारणात नव्यानेच एन्ट्री केलेल्या विक्रम सावंत यांना चांगले बळ मिळाले. त्रिशंकू अवस्था झाल्याने कट्टर वैरी असलेले आमदार जगताप आणि शिंदे एकत्रित येऊन पालिकेवर सत्ता स्थापन केली. त्यामुळे प्रथमच आमदार जगतापांची पालिकेच्या सत्तेत पहिल्यांदा एन्ट्री झाली. 

मात्र, पालिकेचे कारभारी नेत्यांच्या हातात राहिले नाहीत. नगरसेवकांचे अंतर्गत वाद उफाळून आले. त्यामुळे उमेश सावंत यांना उपनगराध्यक्ष पद सोडावे लागले. सुरेश शिंदे व विलासराव जगताप यांच्या काही नगरसेवकांनी  आपल्या सोयींनुसार कारभार केला. विक्रम सावंत यांच्याशी जवळीक साधत निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्व पार्श्वभूमीवर आताच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात सुरेश शिंदे यांनी उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे.

जुने कार्यकर्ते सोडून  गेल्याने नव्या दमाच्या उमेदवारांना घेऊन ते रिंगणात उतरले आहेत. पुन्हा एकदा शहरावर आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र ताकदीचे शिलेदार सोडून गेल्याने त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. त्यांच्या शिलेदारांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसचे बळ वाढले आहे. मात्र जुन्या-नव्याचा ताळमेळ घालणे विक्रम सावंत यांची डोकेदुःखी बनली आहे. उमेदवारीवरून त्यांच्यात खलबत्ते सुरू आहेत. प्रवेश केलेले नगरसेवक आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी आडून बसले आहेत. तर सावंत यांचे कट्टर कार्यकर्ते पहिल्यांदा आमचा विचार करावा, अशी मागणी करीत आहेत. त्यामुळे अद्याप काँग्रेसचे उमेदवार  फायनल झाले नाहीत. मात्र सगळ्यांचा मेळ घालूनच आखाड्यात उतरण्याची तयारी सावंत करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा पालिकेवर फडकविण्याचा इरादा त्यांनी केला आहे. 

आमदार विलासराव जगतापांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. विरोधकांच्या डावावर प्रतिडाव टाकण्याचा इरादा आहे. शहरावर वर्चस्व निर्माण कारण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे. 

काँग्रेसचे नाव गुलदस्त्यात
राष्ट्रवादीने थेट नगराध्यक्ष पदासाठी शबाना इनामदार यांची निवड केली आहे. भाजपने डॉ. रवींद्र आरळी यांच्या पत्नी डॉ. रेणुका आरळी यांचे नाव निश्‍चित केले आहे. काँग्रेसने नाव गुलदस्त्यात ठेवले असले तरी नगरसेविका सौ. शुभांगी बनेन्नवर यांचे नाव आघाडीवर आहे. इथेही चुरशीची लढाई होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com