सांगलीत रंगलाय राष्ट्रवादीतच हल्लाबोल

सांगलीत रंगलाय राष्ट्रवादीतच हल्लाबोल

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आज (बुधवारी) सांगलीत दाखल होत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते सांगलीत येणार आहेत. राज्यभरात सत्ताधारी युतीला लक्ष्य करून उभारलेल्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असताना सांगलीत मात्र पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादात यात्रेला फारशी किंमत दिलेली दिसत नाही.

इस्लामपूरच्या सभेसाठी आमदार जयंत पाटील यांनी जोरदार तयारी केली असली तरी सांगली, तासगावसह अन्य तालुक्‍यात दुर्लक्षच केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी फक्त वाळव्यातच आहे का? असा सूर उमटत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आज सकाळी आटपाडीतून सुरू होत आहे. दुपारी जत, सायंकाळी  मिरज आणि रात्री सांगली असा पहिल्या दिवशीचा दौरा आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात चर्चा झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी हल्लाबोल यात्रा यशस्वी करा, असा आदेश पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.

जिल्ह्यात राष्ट्रवादी दुबळी झाली असताना कार्यकर्त्यांची मोट बांधून हल्लाबोल यात्रेची तयारी करण्याची गरज होती. प्रत्यक्षात वाळवा तालुका वगळता जिल्ह्यात कुठेही जोमाने तयारी सुरू असलेली दिसत नाही. पण तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सांगली, मिरजेत काहीच हालचाल दिसत नाही. जत तालुक्‍यात तर आजच पक्षातील वादावादी चव्हाट्यावर आली.

अंतर्गत वादात अडकला पक्ष
सांगलीत शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्यात वाद नाहीत असा दावा करण्यात येत असला तरी त्यात तथ्य नाही. त्यांच्यातील वाद कायम आहे. कमलाकर पाटील यांच्यावर जयंत पाटील यांनी १४ गावांची जबाबदारी टाकली होती. त्यांच्या गटाने गावागावात फिरून हल्लाबोल यात्रेसाठी बैठका घेतल्या. मात्र, सांगली शहरात तशा बैठका झाल्याचे दिसले नाही. उलट राष्ट्रवादीचे काही नगरसेवक भाजप, काँग्रेसच्या वाटेवर अशाच चर्चा पुन्हा ऐन हल्लाबोल यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झाल्या. संजय बजाज यांच्याकडे शहराची जबाबदारी आहे. त्यांच्याविरोधात नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांना पत्र लिहून असंतोष व्यक्त केला. मात्र त्यावर प्रदेशकडून कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे हल्लाबोल यात्रेकडे नगरसेवकांनीच पाठ फिरवल्याची चर्चा आहे. 

अनेक नेते नाराज
राष्ट्रवादीतील अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळे अंतर्गत वादाचा प्रश्‍न केवळ सांगलीतच आहे असे नाही. वाळव्यातील नाराजीचा फटका नगरपालिका, जिल्हा  परिषद निवडणुकीत पक्षाला बसला आहे. दिलीप पाटील यांनीही विधान परिषद निवडणुकीवेळी नाराजी व्यक्त  केली होती. पक्षाचे जिल्हाध्यक्ष होण्याची त्यांची सुप्त इच्छा अजून पूर्ण होत नाही. चिरंजीव संग्राम यांना तरी किमान युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष करावे अशी त्यांची इच्छा असल्याची चर्चा आहे. पण तेही जमत नाही. इतर तालुक्‍यात दमदार नेते नसल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये  कुरबुरी आहेत. त्यामुळेच जयंत पाटील यांनी जमत नसेल तर पद सोडा असे सांगितले आहे. पण, करायचे काही नाही अन्‌ पदही सोडायचे नाही असेच चित्र दिसत आहे. अशा स्थितीत हल्लाबोल यात्रेत अजितदादा कोणता कानमंत्र देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com