आगाप द्राक्ष छाटणी मुळावर उठली

आगाप द्राक्ष छाटणी मुळावर उठली

सांगली - द्राक्ष बागांची सप्टेंबर महिन्यात फळछाटणी घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागल्याचे निरीक्षण राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्थेने नोंदवले आहे. काही बागा शंभर टक्के तर बहुतांश बागा ५० टक्‍क्‍यांहून अधिक वाया गेल्या आहेत. संस्थेच्या पथकाने शुक्रवारी जिल्ह्यात द्राक्ष नुकसानीची पाहणी केली.

सन १९८८ नंतर पहिल्यांदाच सातत्याने मुसळधार पाऊस झाल्याने द्राक्ष बागा उद्‌ध्वस्त झाल्याचे राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी पाहणीनंतर ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

तासगाव, पलूस, मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, जत, खानापूर पट्टयात द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सप्टेंबरच्या मध्यावर छाटण्या घेतल्या. राज्य संघाने शक्‍यतो दिवाळीनंतर छाटण्या घ्या, असे आवाहन केले होते. मात्र निसर्ग चक्रातील चक्रावून टाकणाऱ्या बदलाचा कुणालाच अंदाज आला नाही.

आगाप छाटणीमुळे मार्केटिंग आणि लवकर बेदाणा निर्मिती करणे, असा दुहेरी फायदा घेण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. तो संकटात नेणारा ठरला आहे. श्री. आर्वे यांनी सांगितले,  की सन १९८८ मध्ये अशा स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर यंदा तो कोसळला. त्यात करपा रोगाने कधी हल्ला केला हे शेतकऱ्यांना कळालेच नाही. कारण, सलग पाऊस होता. फळकूज झाली. ती रोखताना पावसानेच पुन्हा अडचणी निर्माण केल्या.

ते म्हणाले,‘‘दिवाळीनंतर छाटणी घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी तूर्त संकटाची तीव्रता कमी दिसतेय. सध्या दररोज कुठेतरी पाऊस पडताना दिसतोय. तो अजून पाच-सहा दिवस असेल, असा सध्याचा अंदाज आहे. त्यामुळे या बागांना तूर्त तरी कमी धोका आहे. दुसरीकडे धुके कमी झाले असले तरी  उष्णता वाढली आहे. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. त्याबाबत आम्ही शेतकऱ्यांनी सूचना केल्या आहेत.’’

जिल्हाभर सर्वेक्षण करणार
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे पथक सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला सादर करेलच, मात्र त्यानंतर आम्ही जिल्हाभर नुकसानीचा आढावा घेणार आहोत, असे सुभाष आर्वे यांनी सांगितले. जिल्हाभर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. त्यांनी या काळात सावधपणे व तज्ज्ञांच्या सल्ल्याने पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com