राष्ट्रवादीला हटविण्यासाठी  प्रसंगी "महाआघाडी'ही 

राष्ट्रवादीला हटविण्यासाठी  प्रसंगी "महाआघाडी'ही 

सातारा - सातारा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी शिवसेना तयारी करत आहे. हे करताना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला हटविण्यासाठी वेळप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाआघाडीही केली जाईल, असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकीसाठी शिवसेनेतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी ते येथील एका हॉटेलमध्ये आले होते. याप्रसंगी उपनेते, निरीक्षक अनंत तरे, आमदार शंभूराज देसाई, उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख हर्षल कदम, रणजित देशमुख आदी उपस्थित होते. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी "राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडी' स्थापन केली आहे. त्यांच्या संपर्कात आहात का, या प्रश्‍नावर श्री. शिवतारे म्हणाले, ""राष्ट्रवादी, कॉंग्रेसला हटविण्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार महाआघाडी अथवा भाजपशी युतीही केली जाईल. मात्र, तसे झाले तरी उमेदवार पक्ष चिन्हावरच लढतील. शंभूराज देसाई हेही पक्ष चिन्हावर लढणार असून, ते संघटनात्मक बांधणीही करत आहेत.'' 

श्री. शिवतारे म्हणाले, ""नगरपालिकांमध्ये शिवसेना नेतृत्वाने लक्ष न घालताही तब्बल 26 नगराध्यक्ष, 700 नगरसेवक स्वबळावर विजयी झाले. त्यामुळे श्री. ठाकरे यांनी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत लक्ष घालण्याच्या सूचना मंत्र्यांना दिल्या आहेत. राज्यात शिवसेनेची एक हाती सत्ता आणण्याचे हे पहिले पाऊल आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने सत्ता असतानाही केवळ आश्‍वासने देण्याशिवाय काही केले नाही; परंतु शिवसेनेने एक हाती सत्ता आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाणीपुरवठा योजनांसाठी 1800 कोटी दिले. त्या वेळी पाणीपुरवठा योजना मोठ्या प्रमाणात झाल्या. त्यात साताऱ्यातील 15 योजनांचा समावेश होता; परंतु ती कामे जनतेपर्यंत पोचविण्यात आम्ही कमी पडलो. लोकांपर्यंत ही कामे पोचविण्यासाठी शिवसेनेचे विचार घराघरांत पोचविण्यासाठी या निवडणुका स्वबळावर लढविल्या जातील.'' 

नोटाबंदीमुळे देशभरात 40 लाख नोकऱ्या गेल्या. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हा निर्णय जाहीर होताच पहिल्यांदा श्री. ठाकरे यांनी विरोध केला. मुंबईला एक लाख 60 हजार कोटी दिले, असे पंतप्रधान सांगतात, तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी का दिले नाही. राष्ट्रवादी, कॉंग्रेसवाले कुमकवत पक्ष असल्याने शिवसेनाच विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. कुलांगड्या बाहेर निघतील, या भीतीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभेत तोंड बंद करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

अनंत तरे यांनीही स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले. बानुगडे-पाटील यांनी महाआघाडीसाठी उदयनराजे गटातून प्रस्ताव आला असल्याचे सांगितले. 

615 पैकी 159 पाटणचे 
जिल्हा परिषदेसाठी 180, तर 122 गणांसाठी 435 इच्छुकांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी पाटणमधील सात गटातून 52, तर 14 गणांतून 107 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. रात्री सातवाजेपर्यंत वाई, महाबळेश्‍वर, खटाव, माण, पाटणमधील सुमारे 300 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. त्यानंतरही उशिरापर्यंत मुलाखती सुरूच होत्या. 

"हा राजा, तो राजा' 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हा गड म्हटले जाते, मग का येथे मोठे उद्योग आले नाहीत? मी आठ हजार कोटींचा उद्योग माझ्या मतदारसंघात आणला. त्यांना साताऱ्यातही उभे करण्यास सांगितल्यानंतर त्यांनी "सोशल सिक्‍युरिटी' नसल्याचे सांगितले. एकीकडे हा राजा, दुसरीकडे तो राजा, येथे राजांतच सगळे चालले आहे. दुसरे कोणी नाही का? असा सवाल शिवतारे यांनी केला. तसेच किशोर पंडित यांना भाजपने पैसे देऊन नेले, असा आरोपही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com