शिर्डी - अन्नधान्याच्या आयात-निर्यातीचे धोरण व शेतीसाठी हवामानाचा अचूक अंदाज, ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) मोठी कामगिरी आहे. "इस्रो'च्या माध्यमातून येत्या तीन ते चार वर्षांत मोबाईलवर थेट उपग्रहांद्वारे जलद इंटरनेट सेवा मिळेल, अशी माहिती "इस्रो'चे सहायक शास्त्रज्ञ डॉ. सतीश राव यांनी आज दिली.
कोपरगाव येथे डॉ. राव पत्रकारांशी बोलत होते. संजीवनी शैक्षणिक संकुलात "इस्रो'ने आयोजिलेल्या प्रदर्शनानिमित्त त्यांच्यासह शास्त्रज्ञ दीपक पंड्या, एस. एस. मंजूळ, योगेश डेठोलिया व के. नितीन आले आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे व व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे यांनी शास्त्रज्ञांचे स्वागत केले.
डॉ. राव म्हणाले, 'इस्रो'च्या एका "ओशनसॅट'द्वारे मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात मासे नेमके कुठे आहेत, हे कळवले जाते. त्यामुळे मासेमारीत देशाचे वार्षिक उत्पन्न दहा हजार कोटींनी वाढले. काही वर्षांपूर्वी ओडिशात झालेल्या वादळात 16 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर "इस्रो'ने "इन्सॅट थ्रीडी' उपग्रह अवकाशात सोडला. त्याने वादळाचा आगाऊ अंदाज मिळाल्याने ओडिशातच चार वर्षांपूर्वी आलेल्या वादळापूर्वी सात लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविता आले.''
"रिसोर्स सॅट'द्वारे देशातील पिकाच्या क्षेत्राचे व उत्पादनाचे अचूक सर्वेक्षण होते. त्यामुळे अन्नधान्याच्या आयात-निर्यातीचे धोरण ठरविणे सोपे जाते. भूगर्भातील पाणीसाठे लक्षात येतात. राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल योजनेत देशभरात तीन लाख कूपनलिका खोदल्या. त्यासाठी या उपग्रहाद्वारेच झालेले जलसर्वेक्षण 90 टक्के अचूक होते.
"कार्टोसेट'द्वारे कोकण रेल्वेमार्गासाठी अचूक आणि जलद सर्वेक्षण झाले. देशाच्या विकासात, सामान्यांच्या जीवनात "इस्रो'ची भूमिका महत्त्वाची आहे,'' असे राव यांनी सांगितले.
"नाविक' शोधयंत्रणा अधिक अचूक
'जीपीएस' ही अमेरिकेने शोधलेली प्रणाली आहे. "इस्रो'ची "नाविक' शोधप्रणाली त्याहून अधिक अचूक आहे. सैन्य दलासाठी ती वापरली जाते. भूकंपाचा अंदाज वर्तविता येत नाही. त्यावर अमेरिका आणि "इस्रो' संशोधन करीत आहे. त्यासाठी "निसार' उपग्रह सोडला जाणार आहे. "जी-सॅट'च्या आरेखनाचे काम सुरू आहे. या उपग्रहाद्वारे दोन-तीन वर्षांत जलद इंटरनेट सेवा मिळेल,'' असे डॉ. सतीश राव यांनी सांगितले.
|