कोल्हापूर - निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या राज्य राखीव दलाच्या 12 पोलिसांना मंगळवारी विषबाधा झाली. त्यापैकी सहा जणांना उपचारासाठी "सीपीआर'मध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बाहेरगावाहून बंदोबस्त मागविला आहे. त्यात राज्य राखीव दलाच्या चार तुकड्याही आहेत. त्यामध्ये पुणे येथील नानवीज प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांचा समावेश आहे. काल यातील एक तुकडी ताराबाई रस्त्यावरील एका लॉजमध्ये राहण्यास होती. आज सकाळी त्यातील 12 पोलिसांना उलट्या-जुलाबचा त्रास जाणवू लागला. तातडीने त्यांना परिसरातील खासगी रुग्णालयात व तेथून सीपीआरमध्ये दाखल केले. त्यातील सहा जणांना उपचारासाठी दाखल केले. इतरांना उपचार करून सोडण्यात आले.
तानाजी बळवंत नाळे (वय 41, रा. अकलूज, सोलापूर), किरण संजय शेडूरकर (वय 41, रा. पुणे दौंड), बदाम रामदास सोनवर (वय 22, रा. मालेगाव, बीड), पंकज राम जाधव (वय 23, रा. नगर), महादेव श्रीराम रायते (वय 31, रा. नगर) आणि कैलास माधवराव भोसले (वय 40, रा. जाधववाडी, औरंगाबाद) अशी उपचारास दाखल असणाऱ्या पोलिसांची नावे आहेत.
सायंकाळी गृहपोलिस उपअधीक्षक सतीश माने, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी रुग्णालयात भेट देऊन पोलिसांची चौकशी केली. डॉक्टरांकडून अद्याप अहवाल प्राप्त न झाल्याने नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे समजू शकले नाही; मात्र लॉजमधील पाण्यामुळे प्रकृती बिघाडल्याचे उपचार घेत असलेल्या पोलिसांकडून सांगण्यात आले.
|