सोलापूर - प्रशासक नियुक्तीनंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारत आहे. राज्य सहकारी बॅंकेला 31 मार्च 2017 पर्यंत तीनशे कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी दिली.
सोलापूर विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी कर्नाड सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. त्या वेळी त्यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला. कर्नाड म्हणाले, जानेवारी 2017 पर्यंत राज्य बॅंकेकडे 15 हजार 500 कोटी रुपयांच्या ठेवी आल्या आहेत. बॅंकेने आतापर्यंत 14 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यापैकी 8 हजार 300 कोटी रुपयांची कर्जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या माध्यमातून शेती कर्जासाठी वाटप करण्यात आली आहेत.
राज्यातील ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका शेतकऱ्यांना कर्जे देऊ शकत नाहीत अशा जिल्ह्यांमध्ये राज्य बॅंकेच्या वतीने सोसायट्यांच्या माध्यमातून थेट कर्जपुरवठा सुरू केला जाणार आहे. राज्यातील ज्या प्राथमिक सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार चांगले आहेत त्यांना सभासदत्व देण्याचा निर्णय बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत झाला असल्याची माहिती कर्नाड यांनी दिली.
जिल्हा बॅंकांमध्ये पाच हजार कोटी पडून
नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर मधल्या काळात राज्यातील काही जिल्हा बॅंकांनी हजार व पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारल्या. त्यांच्याकडून जुन्या नोटांमधील 350 कोटी रुपये राज्य सहकारी बॅंकांना मिळाले आहेत. परंतु अद्याप जुन्या नोटांमधील पाच हजार कोटी रुपये बॅंकांकडे पडून आहेत. ही रक्कम घेण्याची परवानगी दिली असती तर कर्जखात्यातही रक्कम मिळाली असती.
अशी माहितीही व्यवस्थापकीय संचालक कर्नाड यांनी दिली.
- प्रमोद कर्नाड, व्यवस्थापक राज्य सहकारी बॅंक
|