सोलापूर - मागील वर्षी राज्यातील 150 साखर कारखान्यांनी नऊ लाख हेक्टरवरील उसाचे गाळप करत 160 लाख टन साखरेचे उत्पादन घेतले. परंतु, केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी दोन महिन्यांचा विलंब केला. साखरेचे दर अद्यापही स्थिर नाहीत. त्यामुळे राज्यात सध्या 99 लाख टन साखर शिल्लक असल्याने साखर उद्योग संकटात सापडला आहे.
साखर कारखानदारीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. परंतु, केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. बहुतांशी कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्यापही एफआरपी दिलेली नाही. साखर निर्यातीचा दर 2900 रुपये हा ऐतिहासिक निर्णय आहे. परंतु, निर्यातीचे उद्दिष्ट केवळ 20 लाख टनाऐवजी 40 लाख टन करण्याची गरज आहे. यावर्षीची साखर शिल्लक असून पुढील हंगामातही मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन होणार आहे.
शिल्लक साखर पुढील दोन महिन्यांत न विकल्यास आणि पुढील हंगामात अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना "एफआरपी' देणे कारखान्यांना कठीण होईल, असे कारखानदारांकडून सांगण्यात आले.
कारखानदार म्हणतात...
- उद्योगांसाठी रॉ शुगरची निर्यात व्हावी
- रसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी मिळावी
- साखरेचा बफरस्टॉक लवकर घ्यावा
- निर्यातीवर राज्याने साडेचार रुपयांचे अनुदान द्यावे
- इथेनॉलसाठी प्रतिलिटर 50 रुपयांचा दर हवा
- पेट्रोलपंपासह वाहनांना इथेनॉल विक्रीसाठी परवानगी द्यावी
- विजेचे दर 6 रुपये प्रतियुनिट असावेत
कारखान्यांची स्थिती
160.08 टन - एकूण उत्पादन
60.93 लाख टन - विक्री झालेली साखर
99.15 लाख टन - शिल्लक साखरसाठा
|