सांगली - सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यांत पुढील तीन दिवस उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणावर येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील काही भागांतही ही लाट आलेली आहेच. दरम्यान, उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे. योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गेले दोन दिवस जिल्ह्याचे तापमान 40 अंशांवर आहे; तर गेल्या आठवड्यात पारा 41 अंशांपर्यंत गेला होता. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून काही ठिकाणी मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत पारा 42 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आजचे कमाल तापमान 39 तर किमान तापमान 22.6 अंश होते. हवामान खात्याने आज उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोणती काळजी घ्याल...
हे करा : जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी घ्यावी, ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकावा, घरी बनविलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हे करू नये : लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत, चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा.
|