इस्लामपूर - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानात अनन्यसाधारण कार्य करावे, असे मत किर्लोस्कर ब्रदर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी व्यक्त केले.
राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते म्हणाले, 'ग्रामीण भागात उद्योजकीय संधी कमी असतात. त्यातून मार्ग काढणे कठीण असते. राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालय ग्रामीण भागातच कार्यरत असल्याने या ठिकाणचे विद्यार्थी उद्योग क्षेत्राला अत्युच्च पातळीवर नेण्यास मदत करतील. स्वायत्त महाविद्यालय म्हणून शिक्षण देताना वेगवेगळ्या शाखांचे अभियांत्रिकी शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण बनवावे. कारण, अशाच विद्यार्थ्यांची व तंत्रज्ञानाची सध्या जगात चलती आहे. विद्यार्थ्यांनीही मूल्यांची जोपासना करताना ज्ञानाचा व कार्याचा दर्जा टिकवणे महत्त्वाचे आहे.''
कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे, गव्हर्निंग कौन्सिलचे भगतसिंग पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रभारी कुलगुरू डॉ. मोरे म्हणाले, 'आरआयटी हे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय आहे. ग्रामीण भागात अभियांत्रिकी शिक्षण देताना आरआयटीने दर्जेदार शिक्षणाबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रस्थान अधिक बळकट केले आहे.''
|