सांगली : ''आधी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून ओबींसीनाही बहुजनांमधून वेगळे करण्याचे त्यांचे कारस्थान आहे,'' असा आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे मुख्य प्रवर्तक वामन मेश्राम यांनी आज येथे केला.
राज्यातला दहाव्या बहुजन क्रांती मोर्चाची आज येथील कर्मवीर चौकात सांगता झाली. याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेच्या सांगताप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अठरा पगड जातीच्या सुमारे पन्नासांवर संघटनांनी या मोर्चासाठी आवाहन केले होते. मोर्चात मुस्लिम समाजाचा उल्लेखनिय सहभाग होता.
मेश्राम म्हणाले, ''मराठा क्रांती मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून दलितांचे मोर्चे काढावेत, असा प्रस्ताव संघ परिवारातून आमच्यासमोर आला होता. माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या या माहितीची मी स्वतः पुण्यात येऊन केली. दलितांनी प्रतिमोर्चे काढू नयेत, असे आवाहन काही बहुजन नेत्यांनी केले. मात्र आम्ही मोर्चे काढूच ते मराठा समाजाविरोधात नव्हे तर बहुजनांच्या संघटनासाठी काढू, असे आम्ही जाहीर केले. अहमदनगरपासून सुरु झालेला मोर्चाचा हा सिलसिला देशातील 500 जिल्ह्यापर्यंत जाईल. सहा लाख खेड्यांपर्यत आम्ही बहुजनांची समर्थ आघाडी उभी करू. मराठा समाजाच्या मोर्चात दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा रद्द करा किंवा शिथिल करा अशी मागणी पुढे आणण्यातही संघ परिवाराचा हात आहे. त्यांच्या कुटील कारस्थानाला मराठा मोर्चातील काही लोक बळी पडले. दलित आणि मराठा समाजात भांडण लावायचा हा उद्योग आता मराठा ओबीसींपर्यंत पोहचला आहे. बहुजन मोर्चाला मिळणाऱ्या प्रतिसादाने हादरलेल्या मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा प्रस्ताव जाहीर केला. हे मंत्रालय एप्रिल महिन्यापासून अस्तित्वात येणार आहे. त्यासाठी कोणताही अधिकारी नियुक्त केलेला नाही की निधीची तरतूद नाही. मग एवढी घाई कशासाठी? आम्ही ओबीसींना सांगू शकतो की मंत्रालय महामंडळाच्या नादी लागू नका. तेवढ्याने ओबीसींचे भागणारे नाही. आम्ही तुम्हाला सत्ताधारी बनवू.''
हजरत मौलाना सज्जाद नोमाणी म्हणाले, ''सांगलीची ही दुपार भारतासाठी नवी सकाळ ठरणार आहे. हजारो वर्षापासून भारताच्या या उज्वल परंपरेचे प्रतिक म्हणजे हा मोर्चा आहे. मुस्लिमांनी भयमुक्त होऊन मुख्य प्रवाहाचा भाग बनावे. या देशाच्या मुळ निवासींशी नाते सांगावे.''
यावेळी विविध जाती संघटनांच्या नेत्यांची भाषणे झाली.
सभेपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अनुराधा ऐदाळे, नंदा कांबळे, कल्पना कोळेकर, सलमा मोमीन, किरण रणधीर, अलका मलमे, सुषमा होवाळे, निर्मला चिखले, सुरेखा तेली, नगरसेविका शेवंता वाघमारे, वर्षा वाघमारे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
निवेदनातील प्रमुख मागण्या...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.