पुणे - आदिवासी विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृहे बंद करण्याच्या निर्णयाचा महिला कॉंग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवाहाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही संघटनेने दिला आहे. कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सोनाली मारणे, अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे, तसेच सुवर्णा वाघ, भारती कोंडे, देवकी शेट्टी, सीमा सावंत, गीता तारू आदींनी सोमवार पेठेतील आदिवासी विद्यार्थ्यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर हा इशारा दिला.
राज्यात 60 हजार आदिवासी विद्यार्थी आहेत. यापूर्वी राज्य सरकारतर्फे त्यांची शिक्षण आणि राहण्याची व्यवस्था होत असे.
सरकारच्या नव्या आदेशानुसार 40 हजार विद्यार्थ्यांची व्यवस्था वसतिगृहात केली जाणार असून, उर्वरित 20 हजार विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
या योजनेंतर्गत शहरातील 60 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोनच विद्यार्थ्यांची यासाठी निवड झाली आहे. तसेच 72 हजारांऐवजी प्रत्यक्षात 20 हजार रुपयेच वर्षाअखेरीस त्यांना मिळाले आहेत. तसेच दरमहा मिळणारे 900 रुपये विद्यावेतनही वेळेवर मिळत नाही. या धोरणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. यात बदल न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे मारणे यांनी सांगितले.
|