उरुळी कांचन - पुणे सोलापुर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तळवाडी चौकात मालवाहू ट्रक व टाटा मॅजिक यांच्यात झालेल्या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार झाले. तर टाटा मॅजिकमधील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी जखमी झाले.
गुरुवारी (ता. १८) सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये वामन धोंडिबा कांचन (वय - ८५, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) व बोरी ऐंदी (ता. दौंड) येथील खाजगी कंपनीत कामाला असलेल्या राजूकुमार बालेश्वर सिंग (वय - ३२, रा. मसाढी, जि. पटना) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सर्व जखमी विद्यार्थ्यांना कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेतून तातडीने लोणी काळभोर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांमध्ये अमोल सुभाष म्हेत्रे (वय - १७), हृतिक राजेंद्र पंडित (वय - १७), शैलेश शामकांत दिक्षित (वय - १७, सर्व रा. बोरी ऐंदी, ता. दौंड) यांचा समावेश आहे. त्यापैकी अमोल म्हेत्रे या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे.
श्रीगोंदा (जि. नगर) येथे जाण्यासाठी निघालेले वामन कांचन गुरुवारी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसची वाट पाहत उभे होते. तसेच बोरी ऐंदी येथे कामासाठी निघालेले राजकुमार सिंग देखील कांचन यांच्या बाजूला उभे होते. त्याचवेळी बोरी ऐंदी (ता. दौंड) येथून आलेल्या महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टाटा मॅजिक गाडी ताळवाडी चौकात वळण घेत होती. दरम्यान अचानक आडव्या आलेल्या टाटा मॅजिक गाडीमुळे सोलापूर बाजूकडे चाललेल्या मालवाहू ट्रकच्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला व त्या ट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या वामन कांचन व राजू सिंग यांना चिरडले तसेच पुढे जाऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुचाकींचे नुकसान केले. तळवाडी चौकात झालेल्या अपघातामुळे पुणे सोलापूर महामार्गावर सकाळी तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. लोणी काळभोर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेतली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.