"यिन' मंत्रिमंडळ, महामंडळ प्रतिनिधींची कुलगुरूंशी चर्चा 

"यिन' मंत्रिमंडळ, महामंडळ प्रतिनिधींची कुलगुरूंशी चर्चा 

पुणे - "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे (यिन) मंत्री व महामंडळाच्या अध्यक्षांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. प्रत्येक मंत्री व महामंडळ अध्यक्षांनी डॉ. करमळकर यांच्याशी आपापल्या विभागाबाबत चर्चा केली. महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना शिक्षण किंवा इतर विषयांमध्ये काय समस्या आहेत, या विषयावर सविस्तर चर्चा झाली. डॉ. करमळकर यांनी सर्व विभागांच्या समस्या जाणून घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले; तसेच यिनच्या कार्याचे कौतुकही केले. 

"यिन'चे मंत्री व महामंडळ अध्यक्ष हे त्या-त्या विभागाप्रमाणे आपले कामकाज सांभाळत आहेत; तसेच बरेच उपक्रम राबवीत आहेत, असे सांगत डॉ. करमळकर यांनी यिनच्या उपक्रमांचे कौतुक केले. "यिन'च्या मंत्रिमंडळाचे आकाश टेकवडे (आरोग्यमंत्री), नीरज जाधव (सांस्कृतिकमंत्री), राजदीप तापकीर (उच्च शिक्षण व महिला बालविकास राज्यमंत्री), भावना बिरारी (महिला व बालविकास महामंडळ), अक्षय बर्गे (शिक्षण महामंडळ), निखिल पवार (कृषी महामंडळ), वैभव दसगुडे (जलसंपदा महामंडळ) यांनी आपापल्या विभागातील कामांची माहिती दिली. विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी या वेळी उपस्थित होते. 

अक्षय बर्गे म्हणाला, ""यिनकडून फुटपाथ शाळा चालवली जाते. त्यात अन्य महाविद्यालयांनीही सहभाग घेतला पाहिजे. त्यातून अधिकाधिक गरजू मुले शिकू शकतील. महाविद्यालयांनी यात सहभागी व्हावे, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा.'' 

वैभव दसगुडे म्हणाला, ""स्टुडंन्ट कौन्सिलसाठी सपोर्ट मिळत नाही. त्यासाठी महाविद्यालयीन सहकार्य मिळावे.'' 

आकाश टेकवडे याने आरोग्यासंदर्भात चर्चा केली. ""फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी औषधांबद्दल जनजागृती करावी. त्याबरोबर मुलांची मानसिकता प्रबळ होण्यासाठी कार्यशाळा घ्याव्यात. न वापरलेली औषधे गरजू लोकांपर्यंत पोचवावीत; तसेच रक्त व अवयवदान यासारख्या उपक्रमाची सुरवात विद्यापीठ व महाविद्यालयाच्या स्तरावर व्हावी.'' 

भावना बिरारी हिने महिला सक्षमीकरणासाठी कार्यशाळा व्हाव्यात, असे सुचविले; तर नीरज जाधव याने विद्यापीठाच्या "इनसेम' वर्षातून दोन वेळा कराव्यात. ज्यामुळे विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाणार नाही, असे सांगितले. त्याचप्रमाणे ईबीसी स्कॉलरशिपचे अर्ज ऑनलाइन भरूनसुद्धा ऑफलाइन भरण्यास सांगितले जातात, यातून मार्ग काढण्याची विनंती त्याने केली. 

निखिल पवार याने कृषी महाविद्यालयांची संख्या वाढवायला हवी, जेणेकरून तरुणांचा शेतीकडे कल वाढेल व शेती विकसित होण्यास मदत होईल, असे सांगितले. राजदीप तापकीर म्हणाला, ""पोलिस काका ही योजना खूप उपयुक्त आहे; पण त्याचा प्रचार होणे गरजेचे आहे; तसेच विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोचण्यासाठी महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र फलक असावेत.'' 

एक तास रंगली चर्चा 
विद्यार्थ्यांच्या अडचणी व सूचना ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन डॉ. नितीन करमळकर यांनी दिले. ते म्हणाले, ""गुणपत्रिकेची पुनर्तपासणी करून विद्यार्थ्यांचे किमान 1 ते 3 गुण कशाप्रकारे वाढविता येतील, या प्रस्तावावर विद्यापीठाचे काम सुरू आहे. या गोष्टीवर अनेकांनी टीका केली असली तरी यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही आणि त्यांचे वर्ष वाया जाणार नाही हे पाहत आहोत.'' ही चर्चा एक तास रंगली. या विद्यार्थ्यांकडून चर्चेतील मुद्‌द्‌यांची यादीही मागविण्यात आली व विभागनिहाय चर्चा करून परत बैठक घेण्यात येईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com