ऊसतोड कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे - शैलजा दराडे

ऊसतोड कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे - शैलजा दराडे

सोमेश्वरनगर : ऊस तोंड कामगारांची स्थलांतरीत मुलं व शालाबाह्य मुलं शोधून आणा आणि शाळेत दाखल करा. एकही मूल शाळेबाहेर रहायला नको. त्या मुलांना चुकूनही वेगळेपणाची वागणूक देऊ नका. राहणीमान वेगळे, भाषा वेगळी, गणवेश वेगळा असला तरी ते 'मूल' आहे, 'माणूस' आहे. मुलांमध्ये भेद करू नका. नवीन मुलांनाही तितकेच प्रेम द्या, असे कळकळीचे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी केले. येथील विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलच्या सभागृहामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणारा 'आशा प्रकल्प' आणि 'जिल्हा परिषद शिक्षण विभाग' यांच्या वतीने पुरंदर व बारामती तालुक्यातील शिक्षकांसाठी 'शिक्षक संवाद कार्यशाळा' आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी दराडे यांनी खुला संवाद साधला. 

याप्रसंगी मुख्याध्यापक सचिन पाठक, मानसशास्त्राच्या अभ्यासक समीक्षा एस. एम., विस्तार अधिकारी अनिल जगदाळे, सतीश कुदळे, केंद्रप्रमुख संजय गायकवाड, नवनाथ ओमासे, सुरेश लांघी, संपत जरांडे, श्री. पाटसकर, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर आदी उपस्थित होते. दराडे म्हणाल्या, शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांनी आपल्या कार्यक्षेत्रातील स्थलांतरितांचा शोध घेऊन प्रवेश द्यावा. हे काम कठीण नाही तर नवीन आहे असे समजून सकारात्मक पध्दतीने घ्यावे. आशा प्रकल्प आपल्यावर काम थोपवत नाही तर सहकार्य करत आहे. 

उपशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे म्हणाले, ही मुले परिस्थितीने पिचलेली पण खेळकर असतात. शिकण्यासाठी नव्हे लहान मुले, घर सांभाळण्यासाठी ही मुले येतात. त्यामुळे अधिक प्राधान्य द्या. नियमित मुलांप्रमाणे उपक्रम, स्पर्धा, खेळ घ्या. त्यांची कौशल्ये वेगळी आहेत. संवेदना जागी होऊ द्या. कामाशी प्रतारणा नको. 

बारामतीचे गटशिक्षणाधिकारी किशोर पवार यांनी, बारामतीत सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात 248 मुले आढळली असून माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात सर्वेक्षण सुरू आहे. आमचे कामसू शिक्षक स्थलांतरीत मुलांस शाळेत घेऊन उत्तम शिक्षण देतील. त्यांच्या चाचण्या घेतील असा विश्वास व्यक्त केला. पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी, शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य टिकावे आणि प्रत्येक मूल शिकावे अशी अपेक्षा व्यक्त करत समानता तत्व सांभाळावे असे सांगितले. संतोष शेंडकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल चाचर यांनी सूत्रसंचालन केले तर राजू बालगुडे यांनी आभार मानले.

काय आहे शिक्षण हमी पत्रक?

स्थलांतरावेळी मुलास 'शिक्षण हमी पत्रक' भरून देण्याचे शासनाचे आदेश असतानाही 650 पैकी चारच मुलांना ते मूळ शाळेकडून मिळाले. या सर्व मुलांना पुणे जिल्हा परिषद व आशा प्रकल्पाच्या वतीने ते दिले जाणार आहे. राज्यात प्रथमच मोठ्या प्रमाणात पत्रकाची अंमलबजावणी होत आहे. कार्यशाळेत मुख्याध्यापकांना सदर पत्रक वितरीत करण्यात आले. त्यामध्ये दुसऱ्या सत्राचे गुण, वर्णनात्मक नोंदी व आकारीक मूल्यमापनही केले जाणार आहे. हे पत्रक घेऊन मूल चार वेळादेखील शाळा बदलू शकेल. प्रत्येक शिक्षकाने ते भरावे आणि मूळ गावच्या मुख्याध्यापकाकडून मुलाची अधिक माहिती मागवावी, असे आदेश दराडे व वणवे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com