गाना बजाना तो "इन्फेक्‍शनल बिमारी' है... 

गाना बजाना तो "इन्फेक्‍शनल बिमारी' है... 

पुणे -  ""शास्त्रीय संगीताला भवितव्य राहिले नाही, असे का वाटतेय तुम्हाला. मुळात असा प्रश्‍नच तुमच्या मनात का येतोय, की तुमच्या मैफलींची संख्या कमी झाली म्हणून तुम्ही अशी नाराजी व्यक्त करताय...,'' असे परखड प्रश्‍न संगीतमार्तंड पंडित जसराज यांनी शास्त्रीय संगीतावर टीका करणाऱ्या कलावंतांसमोर उपस्थित केले. गाना बजाना तो "इन्फेक्‍शनल बिमारी' है. वो बढतीही जा रही है और गाना सुनने का "शौक'भी बढ रहा है... असे सांगत त्यांनी रामकली रागातील रचनाही गुणगुणली. 

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवानिमित्ताने पं. जसराज सध्या पुण्यात आले आहेत. या निमित्ताने "सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. "जय हो...' म्हणत त्यांनी संवादाची सुरवात दुर्मीळ रचना गुणगुणत केली. जसराज म्हणाले, ""शास्त्रीय संगीताचे पुढे काय होणार, असा प्रश्‍न ज्यांनी संगीतात तपश्‍चर्या केली आहे, आपले आयुष्य संगीताला वाहिले आहे, सखोल अभ्यास केला आहे त्यांनी उपस्थित केला तर आपण समजू शकू. त्यावर विचार करू; पण इतरांनी असे नकारात्मक प्रश्‍न उपस्थित करणे योग्य वाटत नाही. नकारात्मक बिंदू को हटाओ...'' 

ज्या गायक-कलावंतांना घराण्याची चौकट सोडून पुढे जायचे आहे, त्यांनी जरूर जावे. एखादी चांगली रचना मनाला भावली की तिथे आपण थांबतो. ती ऐकतो. तिला मनात-हृदयात भरून घेतो आणि त्यावर विचार करून पुन्हा ती "आपल्या स्वरातून' खुलवत असतो म्हणजे आपल्या घराण्यातूनच ती व्यक्त करत असतो. शेवटी संगीत हे सात स्वरांचेच आहे. सगळे राग त्यातच आहेत, असे जसराज सांगत होते. 

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाबद्दलही ते भरभरून बोलले. ""मी 1963-64 पासून "सवाई'ला येत आहे. इथे येणे हे "वारी'समान आहे. ही वारी चुकवली असे कधी घडले नाही. आजवर फक्त एकदाच येता आले नाही. सुरवातीला इथे चार-पाच हजार श्रोते असायचे. आता श्रोत्यांची संख्या वीस हजारांपर्यंत पोचली आहे. हे यश दरवेळी डोळ्यांनी पाहतोय. तुम्ही कुठलीही गोष्ट आपल्या गुरूचे किंवा आई-वडिलांचे नाव घेऊन करा, तिला फळ असेच मिळणार जे आज "सवाई'ला मिळत आहे. तसेच यश आम्ही गुरूंच्या नावाने सुरू केलेल्या संगीत महोत्सवालाही मिळत आहे, असेही ते म्हणाले. 

गाण्यातून कोणी "रिटायर' होत नसतो 
"आता पूर्वीसारखे गाता येत नाही', अशी खंत पं. जसराज यांनी "सवाई'च्या मंचावरून गुरुवारी जाहीरपणे व्यक्त केली. त्यांची ही खंत अनेकांच्या मनाला स्पर्शून गेली; पण ती व्यक्त करण्यामागची भावना सांगताना ते म्हणाले, ""आता माझे वय वाढले आहे. येत्या जानेवारी महिन्यात 89 व्या वर्षात पाऊल ठेवेन. अशा वयात बोलणेसुद्धा अवघड असते. मला तर गायचे आहे आणि तेही स्वरात... तुम्हाला आवडेल अशा... म्हणून तशी खंत व्यक्त केली. याचा अर्थ "रिटायर' व्हायचेय असे नाही. वकील, डॉक्‍टर आणि गायक कधीही "रिटायर' होत नसतात. गायकाला कोणी बोलावले नाही तरी घरात त्याचा रियाज चालूच असतो; पण मी भाग्यशाली आहे की लोक मला अजूनही बोलावतात, ऐकतात आणि दादही देतात.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com