जलस्रोत गेले कुठे?

जलस्रोत गेले कुठे?

बेसुमार बांधकामांमुळे शुद्ध पाण्याचे २५ टक्के झरे नामशेष

पुणे - गेल्या काही वर्षांत वाढत्या शहरीकरणाने पुण्याचा कायापालट झाला. मात्र शहरात व उपनगरांमध्ये झालेल्या बेसुमार बांधकामांनी इथल्या जमिनीमध्ये वर्षानुवर्षे खळाळणाऱ्या नैसर्गिक जलस्रोतांचाच अक्षरशः गळा घोटला आहे.

भराव टाकून, बांधकाम करून तब्बल २५ टक्के नैसर्गिक जलस्रोत संपुष्टात आणण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पर्यावरणासाठी सर्वाधिक जागृत असलेल्या शहरातच नैसर्गिक जलस्रोतांना असे संपविले जात असेल, तर अन्य शहरांची काय स्थिती असेल, असा गंभीर प्रश्‍नही निर्माण झाला आहे. 

आंबेगाव येथील काळूबाई मंदिराजवळील गोमुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जलकुंडात काही वर्षांपूर्वी शुद्ध पाणी असायचे. त्यामुळे संपूर्ण गावाची तहान भागत होती; परंतु कालांतराने गावकऱ्यांनी यातील पाण्याचा उपसा केला आणि परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामेही झाली. परिणामी जलकुंडातील पाणी दिवसेंदिवस कमी होत गेले. नैसर्गिक जलस्रोत नष्ट झाल्याने आता येथे दूषित पाणी आहे.
- कल्पना वाजपेयी, नागरिक

पावसावरही परिणाम
शहराच्या पश्‍चिमेकडे नियोजनशून्य विकास होत असल्यामुळे त्याचा परिणाम शुद्ध हवेवरही होत आहे. उंच इमारतींमुळे पश्‍चिमेकडून येणाऱ्या शुद्ध हवेचा प्रवाह विस्कळित झाला आहे. नैसर्गिक जलस्रोत नष्ट झाल्याने अप्रत्यक्ष थंड वारे, पाऊस यावरही परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. 

नागरी वस्तीलाच धोका

बेसुमार बांधकाम, कचरा, राडारोडा भराव टाकल्यामुळे जलस्रोतांचा श्‍वास कोंडला असला, तरीही शहरात जोराचा पाऊस झाल्यास अचानक काही ठिकाणी पूर येण्याचा, बांधकामे पडण्याचा धोका उद्‌भवू शकतो. याची प्रचिती पाषाण, बाणेर, बालेवाडी परिसरात काही वर्षांपूर्वी आली आहे. 

याबाबत भूगोल अभ्यासक श्रीकांत गबाले यांनी ‘पीएचडी’च्या माध्यमातून संशोधन केले आहे. ‘इम्पॅक्‍ट ऑफ अर्बनायझेशन ऑन जिऑग्राफिक इन्व्हार्यंमेंट ऑफ पुणे आणि सराउंडिंग’ अर्थात शहरीकरणाचा पुणे आणि परिसरावर झालेला भौगोलिक पर्यावरणीय परिणाम’ या विषयात गबाले यांनी डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आहे.

असा होतोय परिणाम

मुळा-मुठा नदीचे जलचक्रच विस्कळित

पावसाळ्यात अचानक पुराची शक्‍यता

पुरामुळे बांधकामे कोसळण्याची भीती
एकाच ठिकाणी पाणी साचल्याने आरोग्याला धोका

काय करता येईल

कुठल्याही बांधकामाला किंवा विकासकामाला परवानगी देताना संबंधित जागेवरील जलस्रोतांची तपासणी व्हावी.
महापालिकेने नदीबरोबरच इतर जलस्रोतांभोवती असणारे पूररेषेचे नकाशे प्रसिद्ध करावेत.

संपूर्ण शहरातील जलस्रोतांचे मॅपिंग करावे.

सांडपाणी व्यवस्थापन आराखडा हवा.

मुळा-मूठेच्या प्रवाहावर परिणाम
शहराला जोडणारे नैसर्गिक जलस्रोत हे शेवडी मुळा-मुठा या नद्यांना मिळतात; परंतु जलस्रोत नामशेष झाल्याने मुळा-मुठेच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे. याचा अप्रत्यक्षरीत्या पुणेकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सांडपाणी, कारखान्यांचे दूषित पाणी याबरोबर अन्य कारणांमुळे या नद्या प्रदूषित झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com