#PuneTraffic भिस्त खासगी वाहनांवरच

#PuneTraffic भिस्त खासगी वाहनांवरच

पुणे - बस वेळेत मिळत नाही. स्टॉपवर थांबल्यावर बस येईलच याचीच खात्री नाही. आलेल्या बसमध्ये गर्दी असेल तर ती स्टॉपला थांबेलच असे नाही. इतक्‍या सगळ्यातून बस मिळालीच तर ती रस्त्यात बंद न पडता वेळेत आपल्या जागेवर पोचेल याची शाश्‍वती नाही... म्हणून आम्ही "पीएमपी'ऐवजी आमच्या वाहनाने प्रवास करतो... असा सूर पुणेकरांनी आळवला... 

"सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट'तर्फे (सीएसई) देशातील 14 प्रमुख शहरांमधील सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीचे विश्‍लेषण करण्यात आले आहे. त्यात जेमतेम 40 टक्के पुणेकर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. उर्वरित 60 टक्के पुणेकर प्रवासासाठी स्वतःचे वाहन वापरतात. याबाबत खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या काही पुणेकरांशी साधलेल्या संवादातून ही बाब स्पष्ट झाली आहे. 

का होते वाहतूक कोंडी? 
दुचाकी कमी जागा व्यापते आणि दोन लोक प्रवास करतात. पण, 15 दुचाकींपेक्षा कमी जागा व्यापून मिनीबसमध्ये त्याच्या दुप्पट प्रवाशांना वाहून देण्याची क्षमता असते, तर चार मोटारींमधून 16 लोक प्रवास करतात. पण, त्यासाठी रस्त्यावर एका बसची जागा व्यापली जाते. या एका बसमधून मोटारीच्या तुलनेत आठपट जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, हे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रभावी उपाय आहे. 

मुंबईकरांचा भरवसा सार्वजनिक वाहतुकीवर 
मुंबई आणि कोलकाता येथे प्रभावी सार्वजनिक वाहतूक आहे. या शहरांमधून पुण्याच्या दुप्पट लोक (80 टक्के) सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. या दोन्ही शहरांमध्ये खासगी वाहनांचे प्रमाण 20 टक्के आहे. दिल्ली, बंगळूर येथे सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण 50 टक्के असून, येथून हे प्रमाण कमी होते. चेन्नईमध्ये 45 टक्के, हैदराबाद 42 टक्के, तर पुणे 40 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. 

""प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यातील निम्म्या बसचे आयुर्मान संपले आहे. तरीही, वेळापत्रकानुसार बस धावतील, याचा प्रशासन पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत आहे. बस स्वच्छ राहतील आणि सुटे भाग वेळेत उपलब्ध होतील, यावर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. ब्रेकडाउन कमी करण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू आहे.'' 
नयना गुंडे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी 

""बसने प्रवास करायला आवडतो. कारण, स्वतःला वाहन चालवावे लागत नाही. त्यामुळे सुरक्षित प्रवास होतो. पण, बस वेळेत मिळेल आणि रस्त्यात बंद न पडता योग्य ठिकाणी पोचू याची शाश्‍वती नसते. त्यामुळे नाइलाज म्हणून स्वतःचे वाहन वापरावे लागते.'' 
गायत्री फडके, प्रवासी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com