पुण्यात सिंहगड संस्थेतील कावेरी होस्टेलमध्ये घटना
कात्रज - सिंहगड संस्थेच्या वेणूताई चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आकाश भरत वैष्णव (वय 18, रा. सातारा) या विद्यार्थ्याने आज गळफास लावून आत्महत्या केली. या महिन्यात सिंहगड महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सातारा येथील आकाश हा स्थापत्य शास्त्र पदवीच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता. प्रथम वर्षात तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता; परंतु दुसऱ्या वर्षातील पहिल्या सत्राच्या परीक्षेत तीन विषयांत तो नापास झाला होता.
तो महाविद्यालयाच्या कावेरी होस्टेलमध्ये मित्र साईराज संजय आनंदकर व भागेश चेतन कडीवाला यांच्यासमवेत राहात होता. काल (ता. 28) रात्री अभ्यास करून तिघेही झोपी गेले. आज पहाटे आवाजामुळे अचानक साईराज जागा झाला. आकाशने गळफास घेतल्याचे पाहिल्यानंतर त्याने आरडाओरडा केला. साईराज, भागेश व इतर विद्यार्थ्यांनी आकाशला खाली उतरवले. रुग्णालयात घेऊन जाताना याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. आकाशने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली आहे. त्यामध्ये माझ्या आत्महत्येला मी सर्वस्वी जबाबदार आहे, असा उल्लेख आहे. दरम्यान, या महिन्यात खासगी वसतिगृहातील एक व कावेरी वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत सिंहगड संस्थेतील याच कॅम्पसमध्ये सुमारे दहा आत्महत्या झाल्या आहेत.
|