पुणे - फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील कचरा डेपोतील आग आटोक्यात येत नसल्याने शहरातील कचरा उचलला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सोमवारी (ता.17) केला. कचराकुंड्या भरून वाहत आहेत, कचरा न उचलल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आणि नगरसेवक नाना भानगिरे यांनी कचरा डेपोला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. कचरा डेपोला आग लागल्याने शहरातील कचरा उचलणे बंद करण्यात आले असून, त्यामुळे काही भागात कचऱ्याची समस्या बिकट होत आहे.
डेपोतील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी प्रयत्न होत नसल्याचा आरोप करीत, महापालिकेतील सत्ताधारी पक्ष कचऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी म्हटले आहे. कॉंग्रेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर म्हणाले, ""मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये अनेक ठिकाणी कचराकुंड्या भरून वाहत आहेत. कचरा न उचलल्यास महापालिकेच्या दारात टाकण्यात येणार आहे.''
'शहरात "स्वाइन फ्लू'चा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यातच, अनेक ठिकाणी कचरा पडून आहे. काही भागात तर दोन-तीन दिवसांपासून तो उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची तक्रार भानगिरे आणि भोसले यांनी केली.
|