भीतीच्या दाराशी आत्मविश्वास

sapna-sharma
sapna-sharma

एका ठिकाणी काही माहिती गोळा करायला गेलो असताना, बाहेर दाराजवळच माझी मुलगी थांबली. कारण विचारल्यावर ती म्हणाली, ‘मी नाही येत, तू विचारून ये. मला संकोच वाटतोय.’ मी तिला म्हटलं, ‘मग तर नक्कीच चल आणि प्रश्नही तूच विचार.’ ती चक्रावली. म्हणाली, ‘जे करताना मला भीती आणि संकोच वाटतोय तेच करायला तू मला सांगते आहे.’ मी तिला सांगितले, ‘विचारायची भीती वाटते आहे ना, मग थोडं घाबरतच का होईना एकदा विचारूनच घे. मग कुठेही प्रश्‍न किंवा माहिती विचारण्याची भीती नेहमीसाठी कमी होईल.’ आणि थोड्या वेळाने जबरदस्तीने का होईना, पण कामाचे प्रश्‍न योग्य व्यक्तीला विचारताच तिच्या चेहऱ्यावर तेज पसरले. तिने एक गड फत्ते केला होता. 

सुरवातीची ती भीती स्वाभाविकच आहे. काहीही नवीन करायला घेतलं की त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसते. समोरचा कसा वागेल, काम पूर्ण होईल की नाही, कुठले अडथळे येतील यांसारखे कितीतरी प्रश्‍न मनात धास्ती निर्माण करतात. त्यातच मागे पाऊल खेचणारे असतातच. आपल्याला नसतील तितके प्रश्न ते डागतात. आपल्याला असलेल्या थोड्याफार आत्मविश्वासावरही ते प्रहार करतात. काही महाभाग तर ‘जे तुम्ही ठरवलंय ते होणारच नाही’ असंही ठामपणे सांगून जातात. मग धाकधूक तर असणारच. परंतु, मुळात समस्या या धाकधुकीची नाहीच आहे. खरी समस्याच सुरू होते जेव्हा आपण त्या धाकधुकीची भीती बाळगायला लागतो तेव्हा. लहानपणापासून आपल्याला प्रत्येक गोष्टीत विरुद्धार्थी शब्द आणि विरुद्धार्थी प्रक्रिया असल्याचे शिकवण्यात आले आहे. याचा थेट परिणाम असा झाला आहे, की कुठली गोष्ट आपल्याला आनंद देत असेल तर ती चांगली आणि नाही तर ती वाईट असा काहीसा समज आपण बाळगायला लागलो. 

त्याप्रमाणे आनंद, हसू, आत्मविश्वास, रोमांच, साथ हे चांगले आणि दुःख, अश्रू, भय, कंटाळा, एकटेपणा हे सर्व वाईट. हे आपल्या मनात इतकं खोलवर रुजलेलं आहे की प्रत्येक भावना ही केवळ एक संवेदना असते आणि चांगले-वाईट काहीही नसते हे आपण लक्षताच घेत नाही. भावना कुठलीही असो तिला प्रतिसाद कसा द्यायचा हे आपल्या हातात असतं, हे आपण विसरून जातो. परीक्षा डोक्‍यावर आली की आपल्याला भीती वाटते आणि त्या भीतीपोटी आपण जे वर्षभर नाही केलं, ते एका आठवड्यात साध्य करतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात हा अनुभव घेते. मात्र कितीही भीती असली तरी परीक्षेला जावेच लागेल ही घरच्यांची सक्ती असल्यामुळे आपण ती भीती ओलांडून जातो. दुर्दैवाने पुढच्या आयुष्यात अशी दुसऱ्याची सक्ती नसल्यामुळे आपण कितीतरी मोठमोठ्या संधी भीतीच्या नावाखाली गमावून बसतो. गरज आहे ती फक्त हा संकल्प करण्याची - ‘भीतीच्या दाराशी असताना तिला स्वीकारूनही पुढे जायचंच आहे’. क्‍योंकी डर के आगे जीत है!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com