परवा एका गृहस्थांचा फोन आला. गृहस्थ ओळखीपाळखीचे नव्हेत. त्यांनी कुणाकडून तरी संपर्काचा क्रमांक मिळविला होता. सांगत होते ः माझं नाव असं असं. मी जुनी पुस्तकं घेतो. विकत बरं! आणि ही पुस्तकं कुणाकुणाला देऊन टाकतो. काही पुस्तकांचा मुक्काम माझ्याकडंही असतो. गरज असणारा कुणी भेटला, की त्यांचीही रवानगी होते. तुमच्याकडं जुनी पुस्तकं असतील; आणि ती नको असतील, तर द्या मला. पत्ता सांगा. मी येतो आणि पुस्तकं घेऊन जातो. त्यांचा पुन्हा एकदा खुलासा ः पुस्तकांची किंमत तिथं लगेचच चुकती करीन. त्यांना थोडं थांबवीत म्हटलं ः म्हणजे तुम्हाला संदर्भ-पुस्तकं हवी असणार! त्या गृहस्थांचं आणखी स्पष्टीकरण ः असंच काही नाही. मी काहीही घेईन. मराठी-हिंदी-इंग्रजी पुस्तकं चालतील. संस्कृतही चालतील. अगदी धार्मिक स्तोत्रांची पुस्तकंही मला वर्ज्य नाहीत. एवढंच काय; एखादी पोथी असली, तरी हरकत नाही. यांतलं काहीही असलं, तरी बघा. पत्ता कळवा. मी न चुकता तुमच्याकडं पोचलो म्हणूनच समजा.
मला वाटलेलं आश्चर्य काही केल्या कमी होत नव्हतं. उलट, जेवढा विचार करू लागलो, तेवढं ते आणखी वाढतच होतं. या उत्सुकतेपोटी त्या गृहस्थांना प्रश्न केला ः तुम्ही काय करता? म्हणाले ः हेच. जुनी पुस्तकं विकत घेतो; आणि कुणाकुणाला देऊन टाकतो. कुणी काही किंमत देऊ करतं. आग्रह मोडता येत नाही. जी किंमत मिळेल, ती मला मंजूर असते. त्यांनी पुढं सांगितलं ः पुस्तकांप्रमाणंच मी जुन्या-दुर्मीळ वस्तूही घेतो. कधी आलात या बाजूला, तर बघता येतील तुम्हाला. आधी वाटलेल्या आश्चर्यापुढं मी आणखी एक उभी रेघ मारली.
हे भले गृहस्थ कित्येक वर्षं हा उद्योग मनापासून करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी किती तरी संस्थांना-व्यक्तींना पुस्तकं नेऊन पोचविली आहेत. एकेक नाव ऐकताना माझीच छाती दडपून जात होती. "आश्चर्यां'पुढल्या रेघा वाढत चालल्या होत्या. आतापर्यंत फार कधी न ऐकलेल्या असल्या आश्चर्यांच्या गोष्टी सांगणारे गृहस्थ काही जहागीरदार किंवा बडे जमीनदार-सरंजामदारही नव्हेत. जुनी पुस्तकं, जुन्या वस्तू हा त्यांचा "हळवा कोपरा' आहे.
असलेच आणखी एक जण आहेत. शाळांच्या उन्हाळी सुट्या सुरू झाल्या, की मोठ्या कापडी पिशव्या घेऊन स्कूटरवरून हे गृहस्थ सोसायट्यांत जातात. जुनी पुस्तकं, वह्यांची कोरी पानं गोळा करतात. पुस्तकांचे इयत्तावार गठ्ठे करतात, कोरी पानं जुळवितात; आणि बाइंडिंग करून ही वह्या-पुस्तकं कोकणातल्या दुर्गम भागांतल्या शाळांना देतात. आयटीतल्या काही नोकरदारांची गोष्टही अशीच. आदिवासी भागांतल्या विद्यार्थ्यांना दप्तरं देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. पुढं वर्तुळ विस्तारत गेलं. यंदा ते लाखभर विद्यार्थ्यांपर्यंत जातील.
काय एकेक माणसं असतात नाही? जगावेगळं काही तरी करायचं ठरवितात; आणि ते करून मोकळी होतात. त्यांना मानमरातब नको, बक्षिसं नकोत, हार-तुरे नकोत. कामातला आनंद त्यांचं त्यांचं आभाळ भरून टाकत असतो. अगदी काठोकाठ.
एकेकाला आयुष्याची चव सापडलेली असते, ती ही अशी. रोजचा दिवस यांत्रिक पद्धतीनं मागं ढकलणाऱ्या, संसाराची तोंडमिळवणी करताना आंबून जाणाऱ्या, भलत्या हव्यासांच्या मृगजळांमागं धावाधाव करणाऱ्यांना ही चव मिळेल का कधी?
|