असाही एक मुक्‍तिलढा! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

संपूर्ण महाराष्ट्र अखेर शतप्रतिशत हागणदारीमुक्‍त झाल्यामुळे आम्हाला फार्फार मोकळे वाटू लागले आहे! तब्बल साडेचार हजार कोटी रुपये खर्चून पाच लाख शौचालये बांधण्यासाठी आमच्या सरकारने केव्हापासून कंबर कसली होती...अखेर एकदाचे हे काम ‘झाले’!!

स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी महाराष्ट्रातील गरीबेगुरीबे संधी, वेळ आणि अन्न मिळताक्षणी डबा उचलून बहिर्दिशेस जात असत. पिढ्यान्‌ पिढ्या हे कार्य उघड्या माळरानावरील सेंद्रिय वातावरणातच उरकले जात होते. म्हणूनच ह्याच बहिर्दिशा असे संबोधन पडले, असे आमचे संशोधन सांगते. संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त करण्याचे आधीच्या सरकारच्याही मनात होते, पण कधी कधी अशी कामे वेळेत होत नाहीत, हे एक नैसर्गिक सत्य आहे. काही वेडेवाकडे खाण्यात आले की कुंठितावस्था प्राप्त होते व वेळ लागतो. झारीतील शुक्राचार्य नेमके कोण हे न समजल्याने आधीच्या सरकारचे हात बांधले गेले. तथापि, नव्या उमेदीच्या नव्या सरकारने हातघाईला येऊन ही योजना फळांस आणली, त्याखातर आम्ही त्यांचे शतप्रतिशत अभिनंदन करतो.

शौचालये बांधून काढली असली तरी जनजागृतीचे काम अजून बरेचसे बाकी आहे, ह्याची आम्हाला नम्र जाणीव आहे. शौचालये बांधली तरी ती आपल्यासाठी नसावीत, असा ग्रह होऊन काहीजणे नेमाने बहिर्दिशाच धरत असल्याचे आमचे निरीक्षण आहे. अर्थात हे निरीक्षण आम्ही लांबूनच केले असून एका ठिकाणीच फक्‍त आम्हांस तिखट प्रतिकारास पाठ दाखवावी लागली. (होय, पाठच...तुम्हास काय वाटले? चहाटळ लेकाचे!) ‘हागणदारीमुक्‍त गाव’ अशी पाटी बघून आम्ही आत्मविश्‍वासाने माळरानावर गेलो असता आमच्या अंगावर दगडांचा मारा झाला. सदरील दगड आशंकेने आम्ही उचलून पाहिला असता, आम्हाला संपूर्ण प्रकरणाचा निराळाच वास आला. सबब, आम्ही पाठ दाखवून पळालो. असो.

जनजागृतीसाठी आम्ही ढोबळमानाने तीन योजना राबविणार आहो. आता आपण ह्या एकेक योजनेची संक्षिप्त ओळख करून घेऊ. तथापि, ही नुसती तोंडओळख असेल, अन्य कोठलीही नाही, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.

दरवाजा बंद आंदोलन : महाराष्ट्रात नव्हे, देशातच शौचालये मुबलक आहेत. परंतु, त्यास दरवाजा नसल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी अर्धाच दरवाजा असल्याचेही आम्ही (न डोकावता) पाहून ठेवले आहे. खेरीज काही सामान्यजनांस बंद खोलीत घाबरल्यासारखे होते, म्हणून ते कडीच लावत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. कडी न लावणे हा खरेतर दखलपात्र गुन्हा करावा लागेल! कडी न लावल्यामुळे किती अनवस्था प्रसंग ओढवतात, ह्याची कुणास कल्पना आहे काय? तेव्हा दरवाजा बंद करण्यास प्रोत्साहन देण्याच्या मिषाने दाराच्या मागील बाजूस दिलखेचक पोष्टरे लावण्याची एक योजना आकार घेत आहे.

गुडमॉर्निंग पथक : हे पथक सकाळी उठून घरोघरी जाऊन गुडमॉर्निंग करेल. अर्थात तेव्हा घरातील मंडळी गुडमॉर्निंग करण्यासाठी अन्यत्र गेलेली नसली म्हंजे मिळवलीन!! प्रत्येकाने सकाळी गुड मॉर्निंग करावेच, ह्यासाठी ‘धौती योजना’ सुरू करण्यात येईल. काही वेळा एखाद्याने संध्याकाळी गुड मॉर्निंग केले तर त्याची चौकशी करण्याचे काम हे पथक करेल.

बालशिट्टी योजना : इतकी शौचालये बांधूनही कुणी केवळ चूष म्हणून बहिर्दिशेस (डुलत डुलत) जाताना आढळल्यास किंवा अन्य कुठल्याही अवस्थेत आढळल्यास सदर बालशिट्टीवीर खिश्‍यातील शिट्टी वाजवून पब्लिक गोळा करेल व नियमभंग करणाऱ्यास पळता भुई थोडी करेल. ह्या कार्यासाठी शाळेत सकाळच्या वेळी एक पिरेड बहि:शाल कार्यानुभवासाठी ठेवण्यात येईल. उत्तम बालवीरास दहा वाढीव गुण देण्याची बाब शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे.
...तूर्त एवढे पुराण पुरे! कारण आम्हाला निकड निर्माण झाली आहे...बाय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com