प्रवाशांच्या जिवाशी खेळ 

प्रवाशांच्या जिवाशी खेळ 

गेल्या मे महिन्यात मोठा गाजावाजा करून मुंबई-गोवादरम्यान सुरू झालेल्या संपूर्ण वातानुकूलित आणि अतिवेगवान तेजस एक्‍स्प्रेसमधील चाळीस प्रवाशांना रेल्वेच्या कंत्राटदाराने पुरविलेल्या नाश्‍त्यातून विषबाधा झाल्याने प्रवाशांच्या जिवाशी रेल्वे प्रशासन कशा प्रकारे खेळ करीत आहे, हेच स्पष्ट झाले आहे. रेल्वेतर्फे प्रवाशांना देण्यात येणारे जेवण आणि नाश्‍ता हे माणसांनी खाण्यासाठी योग्य नसते,' असे जळजळीत ताशेरे महालेखापालांनी (कॅग) ओढल्याचा अहवाल जुलैमध्ये संसदेत मांडण्यात आला होता. आता अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे महालेखापालांच्या अहवालावर शिक्कामोर्तबच झाले आहे. 

"कॅग'च्या अहवालाच्या पार्श्‍वभूमीवर, तेजस एक्‍स्प्रेस सुरू करताना प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरवितानाच खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत पुरेशी दक्षता घेण्याची ग्वाहीदेखील रेल्वे प्रशासनाने दिली होती. प्रत्यक्षात या गाडीत पुरविण्यात येणारे खाद्यपदार्थ किती निकृष्ट आहेत, इतकेच नव्हे; तर या खाद्यपदार्थांतून प्रसंगी जिवावरही बेतू शकते, हेच अधोरेखित झाले आहे. मुळात रेल्वेगाड्यांत भोजन, नाश्‍ता पुरवण्याची जबाबदारी "इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन'कडे (आयआरटीसी) असते. मात्र काही गाड्यांतील ही जबाबदारी "आयआरटीसी' खासगी कंत्राटदारांकडे सोपविते. तेजस एक्‍स्प्रेसला पॅंट्रिकारची सोय नसल्याने हे काम गोव्यातील कंत्राटदाराकडे होते. त्याच्याकडील नाश्‍ता खाल्यानंतर "तेजस'मधील सुमारे 40 प्रवाशांना त्रास सुरू झाला. त्यामुळे चिपळूणमध्ये गाडी थांबवून 24 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातील तिघांची प्रकृती अत्यवस्थ झाली.

वेळीच उपचार झाल्याने सर्व प्रवाशांच्या जिवाचा धोका टळला असला, तरी या प्रकाराचे गांभीर्य नाही. त्यातही अत्याधुनिक सुखसोई असलेल्या गाडीतील "खानपान' सेवेविषयी इतका हलगर्जीपणा होत असेल, तर साध्या गाड्यांतील अशा सुविधांचा दर्जा काय असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या प्रकाराची तातडीने दखल घेत रेल्वेने दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले असून, संबंधित कंत्राटदारालाही नोटीस बजावली आहे. चौकशीत कंत्राटदार दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, तरच प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याच्या अशा प्रकारांना आळा बसू शकेल. मात्र यातील कळीचा मुद्दा हा आहे, की एखादी सेवा कंत्राटदाराकडे सोपविली की रेल्वे प्रशासनाची जबाबदारी संपते काय? गाडीत प्रवाशांना दिले जाणारे खाद्यपदार्थ दर्जेदार आणि आरोग्याच्या दृष्टीने निर्धोक आहेत, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी रेल्वेला टाळता येणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com