विकासाचे महाकाय प्रकल्प राबविताना सुरक्षिततेची काळजी योग्य ती काळजी न घेतल्यास काय होऊ शकते, याची प्रचिती पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात झालेल्या भीषण अपघातामुळे आली आहे. सोलापूरच्या उजनी धरणातील 25 टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. त्यासाठी नीरा आणि भीमा या नद्यांना जोडणाऱ्या बोगद्याचे काम सुरू असताना झालेल्या भीषण अपघातात किमान नऊ मजूर मृत्युमुखी पडले. हे मजूर बोगद्यातील धोकादायक काम त्या दिवसापुरते संपल्याचा निःश्वास सोडून लिफ्टने बोगद्यातून बाहेर येत असताना, क्रेनचा दोर तुटला आणि लिफ्ट दीडशे फूट खाली कोसळली.
आता या दुर्घटनेला दोषी कोण याची चर्चा प्रदीर्घकाळ सुरू राहील. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या कामात निव्वळ हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातांच्या बातम्या अलीकडे वारंवार येत आहेत. मुंबईत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम सुरू असतानाही असे अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी लखनौमध्येही मेट्रो रेल्वेच्या कामात मोठा अपघात झाला होता. मात्र सुदैवाने त्यात प्राणहानी झाली नव्हती. अशा महाकाय प्रकल्पांचे काम सर्वसाधारणपणे कंत्राटी पद्धतीने केले जाते. अनेक बड्या कंपन्या अशा प्रकल्पउभारणीत सहभागी असतात. मात्र त्या कशा पद्धतीने आणि विशेषत: सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊन कामे करत आहेत की नाहीत, यावर नजर ठेवण्याची जबाबदारी सरकारची असते.
मुळात ही करोडोंची कंत्राटे कशा पद्धतीने दिली जातात, हे आता गुपित राहिलेले नाही. त्यामुळेच मग संबंधित कंत्राटदार घाईने ही कामे रेटून नेत असतात आणि सरकारही त्याकडे डोळेझाक करीत असते. अशा प्रकल्पांमध्ये काम करणारे बडे कंत्राटदार आणि सरकारदरबारचे उच्चपदस्थ यांच्यातील लागेबांधे असतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. या प्रकल्पातील संबंधित यंत्रणा चार वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती आणि तिची योग्य देखभाल, दुरुस्ती न करता अलीकडेच हे काम पुन्हा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तेव्हा जुन्या यंत्रणेच्या वापरामुळे हा अपघात झाला की अन्य काही कारण त्यामागे आहे, ही बाब चौकशीनंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे या दुर्घटनेची रीतसर चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा होईल हे सरकारने बघायला हवे, तरच अशा प्रकारचे अपघात भविष्यात टळू शकतील.
|