पाणी टंचाई दूर करण्यासाठी विहीर खोदण्यास मुहूर्त सापडेना

songir
songir

सोनगीर (जि. धुळे) : येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी डोंगरगाव (ता. शिंदखेडा) येथील सोनवद धरणाजवळील दापुरा शिवारात विहीर खोदून तेथून जलवाहिनीद्वारे गावाला पाणी पुरवठा करण्याचे ठरून विहीरीसाठी भूमीपूजनही झाले. मात्र तीन आठवडे उलटूनही अद्याप विहीर खोदण्यास सुरूवात देखील झाली नाही. त्यामुळे भर पावसाळ्यातही पाणीटंचाई जाणवत असून आठ ते दहा दिवसाआड मिळत आहे. विहीर खोदण्यास सिंचन विभागाची परवानगी लागते ती गेल्या तीन आठवड्यापासून मिळालेली नाही, असे दिसते.  

येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तापी नदीतून जलवाहिनीद्वारे येथे पाणी मिळण्याची योजना कार्यान्वित होण्यासाठी बराच वेळ जाणार असून आजच पाणी टंचाई जाणवत असल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून डोंगरगाव (ता. शिंदखेडा) येथील सोनवद धरणाजवळ विहीर खोदून तेथून जलवाहिनीद्वारे गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी दापुरा शिवारात एक आॅगस्टला भूमीपूजन करण्यात आले. 

येथील ग्रामपंचायतीत आमदार कुणाल पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत सोनवद धरणाजवळ विहीर खोदायचे ठरले होते. बैठकीस  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाधरन, गटविकास अधिकारी सी. के. माळी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एस. बी. पड्यार होते. त्यानुसार आज पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन यांचे हस्ते भूमीपूजन झाले. यावेळी भूजल तज्ज्ञ सुजीत शिंपी, पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाचे राहूल सैंदाणे, उपसरपंच धनंजय कासार, माजी उपसरपंच प्रकाश गुजर व सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते. सोनवद धरणालगत प्रत्येकी 20 फूट लांबी व रुंदी तसेच सुमारे 50 फूट खोल अशी विहीर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत खोदली जाणार असून सहा लाख रुपये खर्च लागेल. जलवाहिनीसाठी सुमारे 15 ते 20 लाख रुपये खर्च लागेल म्हणून वेगवेगळ्या योजनेतून जलवाहिनी टाकण्यात येईल. असे ठरले होते. सोनवद धरणाजवळ दापुरा शिवारातील जागा सिंचन विभागांतर्गत येते. ग्रामपंचायतीने विहीर खोदण्यासाठी सिंचन विभागाकडे एका पत्राद्वारे परवानगी मागितली आहे. मात्र अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे विहीर खोदणे शक्य झाले नाही अशी माहिती ग्रामविकास अधिकारी अविनाश बैसाणे यांनी दिली. दरम्यान विहीरीसाठी लागणार्‍या खर्चाचा आराखडा तयार झाला असून पाच लाख रुपये मंजूर झाले आहेत. पण विहीर कधी खोदणार हा प्रश्नच आहे.

ग्रामपंचायतीने बोहरी स्मशानभुमीत एक व (कै.)शंकरराव आनंदा महाजन पतसंस्थेतर्फे एक असे दोन बोअरवेल केल्या. काहीसा फायदा झाला असला पण पाणीटंचाई दूर झाली नाही. विहीर खोदल्यानंतर जलवाहिनी टाकण्यासाठी पैशांची जमवाजमव करावी लागेल. त्यासाठी पुन्हा अनेक दिवस वाट पहावी लागेल असे दिसते. ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत असताना अधिकारीवर्ग मात्र शांत बसले आहेत. ग्रामस्थांचे अश्रू त्यांना दिसत नाही. केवळ निष्फळ चर्चा व बैठक होत आहेत. चर्चेमुळे तापी नदीतून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा ग्रामस्थांचा मागणीचा विषय मागे पडत चालला आहे. 

येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तापी नदीतून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा व्यवस्था करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मोठय़ा खर्चासह वेळही लागणार आहे. त्यासाठी विशेष प्रयत्न  सुरू आहेत.  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र आजच पाणीप्रश्न तीव्र असल्याने तातडीचा पण तात्पुरता उपाय म्हणून सोनवद धरणाजवळ विहीर खोदून पाणी येथील सार्वजनिक विहीरीत टाकणे या पर्यायावर काम सुरू करण्यात आले. मात्र सोनवद धरण हा पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत नाही. म्हणून तापी नदीतून येथे पाणी पुरवठा करणारी योजना होणे गरजेचे आहे. सध्यातरी आजची पाणीटंचाई दूर होत नसल्याने ग्रामस्थांत नाराजी व्यक्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com