इगतपुरी - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील 25 टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शनिवार (ता. 20) पर्यंत शाळांना यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर पालकांना 24 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत "आरटीई'चे प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. प्रवेशाची पहिली सोडत 14 व 15 फेब्रुवारीला निघणार आहे.
गरीब घरातील मुलांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळण्यासाठी सर्व शाळांमधील 25 टक्के प्रवेश राखीव ठेवले जात आहेत. विलंब टाळण्यासाठी यंदा जानेवारीपासूनच ही प्रक्रिया राबविली जात आहे.
प्रवेश मिळालेल्या पाल्यांच्या पालकांनी 16 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत प्रवेश निश्चित करावयाचे आहेत. पहिल्या फेरीत ज्या पालकांना अर्ज करता आला नाही, त्यांना अर्ज करण्यासाठी 16 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालावधीत पुन्हा संधी आहे. प्रवेशाची दुसरी सोडत 7 व 8 मार्च या कालावधीत निघेल. त्या यादीतील पाल्यांचा 9 ते 12 मार्च या कालावधीत प्रवेश निश्चित करावयाचे आहेत. दोन्ही फेरीत अर्ज करावयाचे राहिलेल्यांना 9 ते 22 मार्च या काळात पुन्हा संधी दिली जाणार आहे.
आरटीईचे वेळापत्रक
* आरटीई प्रवेशपात्र शाळांची नोंदणी - 10 ते 20 जानेवारी
* पालकांनी ऑनलाइन अर्ज भरणे - 24 जानेवारी ते 12 फेब्रुवारी
* पहिली सोडत काढणे - 14 व 15 फेब्रुवारी
* पालकांनी प्रवेश निश्चित करणे - 16 फेब्रुवारी ते 1 मार्च
* पालकांना अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी - 16 फेब्रुवारी ते 3 मार्च
* दुसरी सोडत - 7 व 8 मार्च
* पालकांनी प्रवेश निश्चित करणे - 9 ते 21 मार्च
* पालकांना अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी - 9 ते 22 मार्च
* तिसरी सोडत - 26 व 27 मार्च
आरटीई प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
रहिवासी पुराव्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीजबिल, टेलिफोन बिल, घरपट्टी, वाहन चालविण्याचा परवाना यांपैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला), जन्मदाखला, बालकाचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र द्यायचे आहे.
|