नाशिक - नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील बेबी वॉर्मरचा (इन्क्युबेटर्स) कोंडवाडा, असुविधा हे नवजात बालकांच्या पाचवीलाच पूजलेल्या होत्या. त्यामुळेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एकाच महिन्यात 55 हून अधिक बालके दगावल्याचे वास्तव "सकाळ'ने उजेडात आणले आणि आरोग्य विभाग खडबडून जागा झाला.
"सकाळ'ने पाठपुरावा करत आक्रमकतेने मांडलेला प्रश्न आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलेली भरीव तरतूद, यंत्रसामग्री, वेळोवेळी दिलेली सरप्राइज व्हिजिट यामुळे आशादायक चित्र उभे राहत शेकडो बालकांना जीवदान लाभले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या खुलणाऱ्या कळ्यांसाठी जणू निरोगी आरोग्याची पाहाटच उगवली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज जिल्ह्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असा राज्यातील एकमेव माता-नवजात बालक अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) उभा राहतो आहे. एवढेच नव्हे तर नवजात बालक (कमी वजनाचे) मृत्युदर निम्म्यावर आणण्यात यश आल्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता कक्षाची (एसएनसीयू) पाहणी केल्यानंतर "सकाळ'शी बोलताना सांगितले.
गेल्या वर्षी ऑगस्ट 2017 मध्ये नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात दाखल 346 बालकांपैकी 55 बालके इन्क्युबेटर्सच्या अभावामुळे दगावली. "सकाळ'ने ( 5 सप्टेंबर 2017) वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राज्यभर एकच खळबळ माजली. थेट आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी नाशिक जिल्ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत सरप्राइज भेट दिली. टप्प्याटप्प्याने इन्क्युबेटर्स उपलब्ध करून देत नवजात बालक कक्षात तातडीच्या उपाययोजना केल्या. एवढ्यावरच न थांबता अधिकाऱ्यांशी मुंबईतून वेळोवेळी संपर्क साधत आढावा घेतला. या सुविधांच्या उपलब्धतेनंतर शेकडो बालकांचे प्राण वाचण्यास मदत झाली.
|