नाशिक - आगामी 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येणार नाही, याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) खात्री पटली आहे. त्यामुळेच संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळीचा बकरा करण्याची तयारी सुरू आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या ऍड. आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी यांनी नुकतीच, "सत्तेत असणाऱ्यांना तेच सर्वेसर्वा असल्याचे वाटते. सध्या राजा कोण आहे हे सर्वांनाच माहिती असले; तरी राजेशाही राहिलेली नाही,' असे म्हणत पंतप्रधानांचे नाव न घेता टीका केली होती.
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ऍड. आंबेडकर म्हणाले, 'भय्याजींचे वक्तव्य वाचल्यानंतर मला हिटलरची आठवण झाली. हिटलरवरही त्याच्या सहकाऱ्यांनी अविश्वास दाखविला होता. त्यामुळे आता संघालाही भाजप पुन्हा सत्तेवर येणार नसल्याची जाणीव झाली आहे. नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक हे आपण सांगितले नाही. हे दाखविण्यासाठी संघाने ही भूमिका घेतली असावी.''
हे दलालांचे सरकार
राज्यात शेतकरी अस्वस्थ आहे. सरकारचे व्यापाऱ्यांना अभय आहे. कॉंग्रेस जातीचे सरकार होते तसे हे दलालांचे सरकार आहे. राज्यातील अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. मात्र, हे गाजरच ठरेल. तसेच, राज्यातील अस्वस्थतेचा कॉंग्रेसला लाभ घेता येत नसल्याची टीका त्यांनी केली. "मी टू' मुळे महिला बोलायला लागल्या ही चांगली गोष्ट आहे. मात्र, यात महिलांनी अकारण कुणाची बदनामी करू नये, असे आंबेडकर म्हणाले.
|