मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे ‘नाव मोठे लक्षण खोटे’

मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे ‘नाव मोठे लक्षण खोटे’

मनमाड - नांदगाव तालुक्‍यातील सर्वांत मोठे उपजिल्हा रुग्णालय येथे असूनही नागरिकांना कोणत्याच सोयी-सुविधा मिळत नसून, समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या या रुग्णालयाचे ‘नाव मोठे लक्षण खोटे’ अशी परिस्थिती झाली आहे. मोठा अपघात, दुर्धर आजार, विविध शस्त्रक्रियांसाठी आजही नाशिकला धाव घ्यावी लागते. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, येथे तातडीने व चांगले उपचार व्हावेत यासाठी सर्वसोयींनीयुक्त सुसज्ज रुग्णालयाची गरज आहे.

मनमाडच्या आसपासचा ग्रामीण परिसर शहराशी निगडित आहे. यामुळे येथे शासनाने मोठ्या इमारतीचे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निर्माण केले. तालुक्‍यातील ग्रामीण भागातून रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र, प्रसूती, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, प्राथमिक वैद्यकीय तपासणी, इतर उपचार सोडल्यास येथे इतर गंभीर आजारांवर उपचार केले जात नाहीत. तशी सुविधाही उपलब्ध नाही. 

खासगी रुग्णालयांचीही तीच परिस्थिती आहे. दोन-तीन खासगी रुग्णालये सोडली तर शहरात मोठे रुग्णालय नाही. येथे रेल्वे जंक्‍शन असल्याने देशभरातील प्रवाशांची वर्दळ असते. शहरातून इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग, तसेच चांदवड- मनमाड, नांदगाव- मनमाड, येवला-मनमाड असे चार राज्य महामार्ग गेले आहेत. यामुळे सतत अपघात होतात. अपघातग्रस्त रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात आणले असता, 

प्राथमिक उपचाराखेरीज येथे कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. 

रुग्ण गंभीर असल्यास रस्त्यातच दगावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रुग्णालयात पुरेसे पाणी नाही. पाण्याअभावी रुग्णांसह त्यांचे नातेवाईक, डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांचे हाल होतात. नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने रुग्णालय तयार केले असले, तरी समस्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.

उपजिल्हा रुग्णालय असून फायदा नाही. साध्या उपचाराशिवाय येथे कोणतेच उपचार केले जात नाहीत. अनेकदा आंदोलने, निवेदने दिली. पण प्रशासनाने रुग्णांना सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. शासनाने लक्ष घालून चांगल्या सुसज्ज सुविधा द्याव्यात.
- रवी खोटरे, सामाजिक कार्यकर्ते, मनमाड

उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना कोणतीच सुविधा मिळत नाही. शीतगृह नसल्याने मृतदेह ठेवण्यास मोठी अडचण होते. अनेकदा अंत्यविधीचे काम आमच्या संस्थेला करावे लागते. रक्तपेढी नाही, पुरेशी औषधे व स्टाफ नाही. येथे सुसज्ज रुग्णालयाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात.
- विलास कटारे, सामाजिक कार्यकर्ते, प्रमुख, मिलिंद सामाजिक संस्था

मनमाड उपजिल्हा रुग्णालयात कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. रुग्णांना जीव गमावण्याची वेळदेखील येथे आली आहे. यामुळे आरोग्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांना भेटून निवेदन देणार आहे
- अल्ताफ खान, शिवसेना वरिष्ठ नेते, मनमाड

या सुविधांची गरज
शीतपेट्यांची संख्या वाढवून स्वतंत्र शीतकक्ष निर्माण करावा, तज्ज्ञ डॉक्‍टरांची नेमणूक, ११० बेडची व्यवस्था, सुसज्ज २० आयसीयू बेडचे निर्माण, स्वतंत्र मेडिसीन विभाग, ईसीजी सुविधा, अद्ययावत डिजिटल एक्‍स-रे मशिन, गर्भवती महिला, तसेच इतर रुग्णांसाठी सोनोग्राफी व तज्ज्ञ उपलब्ध करावेत, रक्तसंकलन केंद्र सुरू करावे, डोळ्यांची शस्त्रक्रिया, बाळ तसेच बाळंतिणीचे उपचार, अपघाताचे सर्व उपचार, जळीत, हृदयविकार, पक्षघात, मधुमेह, कर्करोग, तसेच गंभीर आजारांचे उपचार येथे व्हावेत, अशी सामान्यांची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com