संघर्षाला "जन'प्रतिसाद...विश्वासार्हतेचं काय? 

संघर्षाला "जन'प्रतिसाद...विश्वासार्हतेचं काय? 

आठवड्यापूर्वी कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा खानदेशच्या भूमीतून सुरू झाला...कॉंग्रेसी नेत्यांच्या दाव्यानुसार त्याला प्रतिसादही मिळाला.. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे कॉंग्रेससाठी चांगले द्योतक मानले पाहिजे...पण सरकारविरोधी वातावरण आयतेच तयार असताना सक्षम विरोधीपक्ष म्हणून कॉंग्रेसला अद्यापही हवी ती विश्वासार्हता मिळालेली नाही, या वास्तवाचे भान नक्कीच ठेवावे लागेल... 
 
पहिल्या ग्रामीण कॉंग्रेस अधिवेशनाची पार्श्वभूमी लाभलेल्या फैजपूर येथून कॉंग्रेस जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा गेल्या 4 तारखेला सुरू झाला. ऐतिहासिक स्थळ म्हणून कॉंग्रेसी नेते बऱ्याचदा फैजपूरचा वारसा सांगत त्याचा योजून वापरही करतात. अनेक वर्षांपासून ही परंपरा इमाने इतबारे सुरू आहे. अर्थात या परंपरेवर आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण यावेळी पुन्हा संघर्षयात्रेच्या निमित्ताने फैजपूरचा वापर झालाच.. या संघर्षयात्रेची स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी चांगली तयारीही केली होती, जेवढी तयारी, तेवढा प्रतिसाद.. असे चित्रही दिसले.. 
यानिमित्ताने कॉंग्रेसी नेत्यांचा जोश, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि "जन'प्रतिसाद असा त्रिवेणी संगम जुळून आला. आता हाच जोश, उत्साह अन्‌ प्रतिसाद सहा महिने तरी टिकवून ठेवण्याचे आव्हान कॉंग्रेस कसे पेलणार? हा खरा प्रश्न आहे. 
2014 पूर्वी कॉंग्रेस देशात व्‌ राज्यात सत्तेत असताना आता यात्रा काढणारे नेते कधीही जनतेत गेले नाहीत की त्यांचे प्रश्न जाणून घेतले नाहीत.. खानदेशातील नेत्यांची स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. आमदार- खासदार नसतीलही, पण अगदी शासन दरबारी सामान्यांचे काही प्रश्न असतील तेही सोडविण्यासाठी कुणी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजविल्याचे ऐकिवात नाही.. उलटपक्षी विरोधात असूनही भाजप नेत्यांनी सामान्यांची अशी कामे कॉंग्रेसी मंत्र्यांकडूनच करून घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.. त्यातूनच खरी विश्वासार्हता निर्माण होते. ती कॉंग्रेसी नेते कशी मिळविणार? 
जनसंघर्ष यात्रा हे साधन किंवा निमित्त म्हणून चांगली सुरवात आहे, असे वाटते.. यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी अशोकरावांनी जळगावातील बुद्धिवंतांशी साधलेला संवाद हा स्तुत्य उपक्रम मानला पाहिजे; पण या संवादाचा "परामर्श' घेतला तर तो एखाद्या मुख्यमंत्र्याने भरविलेला जनता दरबार होता की काय अशी शंका येते.. सामान्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या तर त्या मानसिकतेत जावे लागेल, अद्यापही आपण सत्ताधारी म्हणून जनमानसात वावरत असाल तर ते उचित ठरणार नाही.. अर्थात हीच बाजू भाजपलाही लागू आहे, कारण भाजप नेतेही विरोधकांच्या मानसिकतेतून बाहेर यायला तयार नाही. असो... 
कॉंग्रेसी यात्रा खानदेशातून मार्गस्थ झाल्यानंतर आता विविध प्रश्न, समस्यांवरून सरकारविरोधी वातावरण कायम ठेवण्यासह जनतेची विश्वासार्हता प्राप्त करण्यासाठी कॉंग्रेसला कसब पणाला लावावे लागेल..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com