नाशिक - मुसळधार पावसाने जिल्ह्याभरातील धरणांत मुबलक पाणीसाठा झाल्याने सिन्नर, निफाडसह विविध भागांत यंदा वन्यपशूंचा संचार वाढला आहे. भक्ष्य मिळवण्यासाठी बिबटे पुन्हा लोकवस्तीत घुसू लागले आहेत.
जिल्ह्यातील विविध भागांत वन्यजिवांचा संचार वाढल्याने भक्ष्याच्या शोधातील बिबटे लोकवस्तीत दिसू लागले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत तीन ठिकाणी लोकवस्तीत घुसलेल्या बिबट्यांनी नागरिकांची घबराट उडवली. त्यात, सटाणा तालुक्यात बिबट्याने मेंढपाळ कुटुंबातील चिमुकल्याचा उचलून नेल्याचे वृत्त आहे. सिन्नरला अपघातात बिबट्या ठार झाला; तर निफाडला वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. या घटनांमुळे बिबटे व माणसांतील संर्घष येत्या काळात आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
बागलाण तालुक्यात तळवाडे भामेर शिवारात बिबट्याने मेंढपाळ कुटुंबातील चिमुरडे बालक पळविल्याचे वृत्त आहे. मेंढ्यांसोबत उघड्यावर वस्ती करुन राहणारे कुटुंब झोपले असताना, मेंढ्यांच्या मागावर आलेल्या बिबट्याने झोपेतील चिमुरडे बालकच पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. नरभक्षक बिबट्याच्या दहशतीने बागलाण तालुक्यात घबराट पसरली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नरनजीकच्या मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. मोहदरी घाटाजवळ
मोह गावाजवळ पावणेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सरपंच सुदाम बोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी वन विभागाशी संर्पक साधून बिबट्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पूर्वीच त्याचे निधन झाले होते.
निफाड तालुक्यात शिवरे शिवारात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मध्यरात्री बिबट्या अडकला. निफाड तालुक्यातही नदीलगतच्या गावांत बिबट्यांचा संचार वाढला आहे. भक्ष्याच्या शोधातील बिबटे तेथील पशुधन पळवित असल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
|