त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तीनाथ यात्रोत्सवासाठी राज्यभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांमुळे ब्रह्मगिरी परिसरात वारकऱ्यांचा मेळा भरला आहे. टाळ मृदुंगाचा गजर अन् ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने ब्रह्मगिरीचा परिसर दुमदुमून गेला आहे. कुशावर्तात स्नान, संत निवृत्तीनाथ समाधीचे दर्शन, गंगाद्वारचे दर्शन घेण्यासाठी तसेच ब्रह्मगिरीचा प्रदक्षिणा मार्गासह संपूर्ण परिसर वारकऱ्यांनी व्यापून गेला आहे. संत निवृत्तीनाथांच्या पादुकांची दुपारी चारला भव्य मिरवणूक काढण्यात आली. चांदीच्या रथातून पादुका मिरवणुकीने कुशावर्तात आणून स्नान घातल्यानंतर ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पुन्हा समाधी मंदिरात नेण्यात आल्या. या वेळी वारकरी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
‘मागील आठवडाभर नाशिकसह राज्यभरातील दिंड्यांमधून नाशिक जिल्ह्यातील गावोगावचे वारकरी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने दरमजल करीत काल (ता. 22) सायंकाळपर्यंत त्र्यंबकेश्वरमध्ये पोचले. ब्रह्मगिरीच्या पसिरातील दोन किलोमीटरच्या परिघात जवळपास 1200 दिंड्या विसावल्या आहे. संत निवृत्तीनाथ समाधीची रविवारी (ता.22) रात्री अकराला विश्वस्तांतर्फे महापूजा करण्यात आली. देवस्थानचे अध्यक्ष संजय महाराज धोंगडे यांच्यासह विश्वस्तांनी महापूजना केली. त्यानंतर आज पहाटे खासदार हेमंत गोडसे, नगराध्यक्षा सौ. लढ्ढा, धर्मादाय आयुक्त श्री. घुगे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. वारकरी आज भल्या पहाटेपासून दिंडीतील पालखीत त्या त्या भागातील संतांच्या पादुका घेऊन कुशावर्तावर स्नानासाठी येत असल्यामुळे वारकऱ्यांच्या गजबजीमुळे त्र्यंबकेश्वरमधील प्रत्येक रस्त्यावर जणू वारकऱ्यांच्या गर्दीचा महापूर आले आहे.
संत निवृत्तीनाथांच्या पादुकांची दुपारी चारला भव्य मिरवणूक काढण्यात आली. चांदीच्या रथातून पादुका मिरवणुकीने कुशावर्तात आणून स्नान घातल्यानंतर ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पुन्हा समाधी मंदिरात नेण्यात आल्या. या वेळी वारकरी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
गजानन महाराज संस्थानतर्फे वारकरी सेवा
संत निवृत्तीनाथांच्या समाधी दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी गजानन महाराज संस्थानतर्फे समाधी मंदीराबाहेर वारकऱ्यांना महाप्रसाद दिला जात आहे. संस्थानच्या मठामध्ये आज सकाळी 156 दिंड्यांना 20 टाळ, मृदुंग, विणा, पताका, भागवत व ज्ञानेश्वरी देण्यात आली. या शिवाय या दिंड्यांमधील वारकऱ्याना महाप्रसादही देण्यात आला. षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंत सरस्वती यांच्या हस्ते दिंड्यांना साहित्य वाटप करण्यात आले.
|