शहादा (जि. नंदुरबार) - (कै.) सौ. जी. एफ. पाटील विद्यालयात बारावी विज्ञान शाखेतील पाच विद्यार्थी गरम पाण्याचा झरा असलेल्या उनपदेवनजीकच्या दरा धरणात बुधवारी पोहण्यासाठी गेले असता त्यातील तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर दोघांना वाचविण्यात यश आले आहे.
आदिवासी दिनानिमित्त आज शाळेला सुटी होती. शिकवणीस जातो, असे घरी सांगून चेतन नामदेव बेलदार (वय 20, रा. लोहारा), तुषार राजेंद्र अहिरराव (वय 18, रा. शहादा), जयेश अशोक सोनवणे (वय 18, रा. शहादा), ललित रामराव पाटील (वय 18, रा. शहादा), नितीन वसंत निकम (वय 19, रा. तळोदा) हे पाच मित्र उनपदेव (ता. शहादा) या पर्यटनस्थळी मोटारसायकलीने गेले. दुपारी तीनच्या सुमारास दरा धरण परिसरात ते पोचले. चेतन, तुषार व जयेश हे तिघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले; मात्र पाण्याची खोली व गाळाचा अंदाज न आल्याने ते बुडाले. पाण्यात उतरलेले आपले मित्र दिसत नसल्याने बाहेर असलेल्या ललित व निखिल यांनी आरडाओरड केला. तो ऐकून ग्रामस्थ व मजुरांसह मासेमारी करणारे युवक धावून आले. त्यांनी पाण्यातून तिघांना बाहेर काढले; मात्र धरणाच्या पाण्यात बुडून तिघांचा जागीच अंत झाला होता.
|