
नागपूर : राज्यपाल, शिक्षण मंत्री आणि विविध विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यानुसार १ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना एक तासाचा पेपर देण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेत ५० बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश करण्यात येणार आहे. यापैकी २५ प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून विद्यापीठांना ऑनलाईन, ऑफलाईन, बहुपर्यायी प्रश्न असे काही पर्याय देण्यात आले. त्यापैकी विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या परीक्षेत मार्चपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित पेपर घेण्यात येणार आहे. यानुसार परीक्षेदरम्यान एका दिवसात चार टप्प्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये ९.३० ते १०.३० यादरम्यान वाणिज्य शाखा, ११.३० ते १२.३० यादरम्यान मानव्यशास्त्र शाखा, १.३० ते २.३० दरम्यान विज्ञान शाखा, ३.३० ते ४.३० दरम्यान अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा घेण्यात येईल.
परीक्षेचे वेळापत्रक दोन ते तीन दिवसांत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येईल. रविवारी व इतर सुटीच्या दिवशीही विद्यार्थ्यांना पेपर द्यावे लागणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देता येणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन संपल्यावर ऑफलाईन परीक्षा होईल. पत्रकार परिषदेत कुलसचिव डॉ. नीरज खटी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे उपस्थित होते.
प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २५ सप्टेंबरदरम्यान
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते २५ सप्टेंबरदरम्यान घेण्यात येणार आहेत. या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील. याचे गुण महाविद्यालयांना विद्यापीठाच्या पोर्टलवर भरता येईल. याशिवाय इतर सेमिस्टरमध्ये बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांचे पेपर महाविद्यालयस्तरावर घेण्यात येणार असून, राज्य सरकारने ठरविलेल्या ५० टक्के थेअरी आणि ५० टक्के आंतरिक गुणाच्या आधारावर त्या घेण्यात येईल.
विद्यापीठातून अंतिम वर्षाच्या १८० परीक्षेत ६३ हजार ५४० नियमित विद्यार्थी तर ७ हजार ३७९ (बॅकलॉग परीक्षा) माजी विद्यार्थी असे एकूण ७० हजार ८८३ विद्यार्थी सहभागी होतील. यासाठी १ हजार १३५ प्रश्नपत्रिका तयार करण्यात येत आहेत. कोरोनामुळे प्रथमच बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश करण्यात आला असल्याने प्राध्यापकांकडून प्रत्येकी १० प्रश्न प्रश्नपेढीसाठी तयार करून घेतले. या सर्व परीक्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १२ सदस्यांची समिती तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील ऑनलाईनची परीक्षेची भीती जावी याकरिता २३ ते २७ दरम्यान मॉक टेस्ट घेण्यात येईल.
पुस्तकांचा वापर होईल अशी शक्यता असली तरी एका तासात २५ प्रश्न सोडवायचे आहेत. एका प्रश्न सोडवण्यास २ मिनिटाचा वेळ लागत असून, पुस्तकातून बघून पेपर सोडविल्यास विद्यार्थ्यांना केवळ १० प्रश्नच सोडविता येतील. शिवाय विद्यार्थ्यांनी पेपर सोडविताना हालचाल केल्याच सॉफ्टवेअरमध्ये ते माहिती पडणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने लॉगीन केल्यावर एक तासात त्याला इंटरनेटशिवाय पेपर सोडविता येणार आहे. एक तास संपताच आपोआप पेपर विद्यापीठाकडे जमा होईल, असेही त्यांनी सांगितले.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.