यवतमाळ - अन्न, वस्त्र निवाऱ्याइतकीच वीज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. ती वापरताना योग्य काळजी घेतली, तर अपघात टाळता येतात. यासाठी दरवर्षी 11 ते 17 जानेवारीदरम्यान महावितरणच्या वतीने वीज सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. मात्र, गेल्या वर्षभरात तब्बल दोन हजार अपघात झालेले आहेत. त्यात 846 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 767 जनावरांचेही प्राण गेलेत.
वीजतारांमध्ये अडकलेली पतंग काढणे, वीजवाहिनीखाली घरांचे बांधकाम करणे, वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणे, ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळणे, तसेच आकडे टाकून किंवा अनधिकृत विजेचा वापर करणे अपघाताला निमंत्रण देणारे आहे. हा धोका टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असते. सुरक्षित वीजवापरासाठी महावितरणकडून मार्गदर्शन केले जाते. मात्र, विजेसोबत अनवधानाने झालेली चूकही अनेकांना भारी पडली आहे. पाच वर्षांतील अपघाताची आकडेवारी पाहिल्यास दरवर्षी दोन हजारांवर अपघात झालेले आहेत. त्यात प्राणांतिक, अप्राणांतिक अपघातांचा समावेश आहे. वर्षभरात दोन हजार 188 अपघात झालेले आहेत. त्यात 846 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, तर 566 नागरिकांचा अप्राणांतिक अपघातांत समावेश आहे. जनावरांचा जीवही मोठ्या प्रमाणात गेला आहे. एकूण 767 जनावरांचे प्राणांतिक, तर नऊ जनावरांचा अप्राणांतिक अपघात झाला आहे. अपघात महावितरण कर्मचाऱ्यांचा असो, वीजग्राहकांचा असो वा इतर कुणाचाही, अपघातामुळे होणारी हानी कधीच भरून निघत नाही. वीज दुसरी संधी देत नाही. त्यामुळे केवळ महावितरणने जनजागृती करून अपघात टाळता येत नाही, तर प्रत्येकाने विजेची उपकरणे हाताळताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
वर्षनिहाय नागरिकांची प्राणांतिक संख्या - एकूण
2010-11 - 726 - 2,032
2011-12 - 802 - 2,269
2012-13 - 667 - 1,962
2013-14 - 810 - 2,407
2014-15 - 807 - 2,228
2015-16 - 846 - 2,188
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.