अकोला - बदलत्या काळात शेतीपद्धतीत सुधारणा झाल्या. पीक उत्पादकता वाढली, तरी दुसऱ्या बाजूला उत्पादन खर्चही वाढला. शेतीमध्ये कुशल मनुष्यबळाची समस्या सर्वत्र भेडसावत अाहे. अशा स्थितीत शेतीत अधिकाधिक यांत्रिकीकरण गरजेचे अाहे. यासाठी सरकारच्या पाठबळाची अावश्यकता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अाज भारतीय शेतीत (त्यातही जिरायती) यंत्र, अवजारांचा जुजबी स्वरूपात वापर होत अाहे. तो एका मर्यादेपलीकडे जात नसल्याने खऱ्या अडचणी अाहेत. छोट्या-छोट्या शेतकऱ्यांना महागडी यंत्रे परवडत नाहीत. त्यामुळे कमी क्षेत्र असलेला शेतकरी अाजही पारंपरिक पद्धतीनेच शेती कसतो अाहे. यांत्रिकीकरणाबाबत शेतकऱ्यांच्याही अपेक्षा आहेत. त्या अशा -
शेतीकडे शास्त्रज्ञ, सरकारचे दुर्लक्ष
पारंपरिक शेती पद्धतीत अामूलाग्र बदल होत अाहेत. अाम्ही शेतीमध्ये जास्तीत जास्त ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, थ्रेशर यांचा वापर करतो. पावसाळ्यात बैलाद्वारे करावी लागणारी अांतरमशागत सोडली तर इतरवेळी यंत्रांचा वापर केला जातो. त्यामुळे पैशांची बचत होते. अाज मजूर मिळणे कठीण बाब झाली. अडवणूक टाळण्यासाठी यांत्रिकीकरणाला सध्यातरी पर्याय नाही.
सरकारला यासाठी मोठ्या प्रमाणावर माफक दरात यंत्र उपलब्ध करता येऊ शकतात. जगातील यांत्रिकीकरणाचा विचार करता अापण खूप मागे अाहोत. सरकारने स्थानिक पातळीवरील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून यंत्र संशोधनावर भर द्यावा. विदर्भाचा विचार करता मुख्यत्वे कापूस वेचणीसाठी मजुरीत भरमसाठ वाढ झाली. शेतकऱ्यांना अार्थिक भुर्दंड सहन करावा लागला. ब्राझीलसारख्या देशाचा विचार करता आपल्यालाही कापूस पेरणी, वेचणी यंत्राने करता येईल. अाज शास्त्रज्ञांनी अंतराळ, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांत मोठा नावलौकिक मिळवला, ही चांगली बाब अाहे; परंतु दुर्दैवाने शेतीमध्ये शास्त्रज्ञ, सरकार यांचे दुर्लक्ष झालेले अाहे.
- गणेश श्यामराव नानोटे, प्रगतिशील शेतकरी, निंभारा जि. अकोला.
यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन हवे
सध्या आम्ही मूग, तूर, ज्वारी, कपाशीची पेरणी यंत्राने करतो. नंतर बैलचलित यंत्रे, तसेच ट्रॅक्टरवरील फवारणी यंत्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. यांत्रिकीकरणामुळे कपाशीची पेरणी खूप सोपी झाले. त्यामुळे एका दिवसात दोन मजुरांच्या साह्याने १५ ते २० एकर पेरणी होते. बियाणे व मजुरांची बचत होते. यांत्रिकीकरणाच्या वापरामुळे फवारणी करण्यासाठी खूप सोईस्कर अाहे. सरकारने यांत्रिकीकरणाच्या जागृतीसाठी प्रोत्साहन द्यावे. कंपन्यांनी नवीन यंत्र विकसित केले अाहे. कापूस वेचणीसाठी सहज सुलभ यंत्र, फवारणीसाठी ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर, या दृष्टीने विचार झाला पाहिजे. शेतकऱ्यांना विनाअट तसेच व्याजात सवलत देऊन अर्थसाह्य केले पाहिजे.
- अनुप साबळे, युवा शेतकरी, तरोडा, ता. अकोट, जि. अकोला.
यंत्र खरेदीसाठी स्वातंत्र्य द्यावी
आजच्या काळात शेतीसाठी तयार झालेल्या यंत्रामुळे शेतीच्या मशागतीपासून, बियाणे पेरणी, माल उत्पादित करून बाजारात नेण्याचा प्रवास सुखकर आणि सुरळीत झाला. परंतु जागतिक पातळीवर शेतीकरिता असलेली यंत्रे, अवजारे आपल्याही शेतकऱ्यांना मिळायला हवीत. त्याला कोणतीही शासनाची अट नको. यांत्रिकीकरणाची स्वतंत्रता जरी शेतकऱ्यांना दिली तरी, ते विकत घेण्याकरिता शेतकऱ्यांकडे पैसा हवा. त्याकरिता शासनाने बाजारपेठ स्वातंत्र्य आणि तंत्रज्ञान स्वातंत्र्यता द्यावी. जेणे करून यंत्र, अवजारांच्या वापरातून पीक उत्पादनात वाढ मिळविणे शक्य आहे. जागतिक बाजारपेठांमधील स्पर्धेत आपल्या शेतकऱ्यांचे अस्तित्व निर्माण होईल. यामधून शेतकऱ्यांकडे पैसा येईल. शेतकरी नवनवीन अवजारे खरेदी करतील.
- लक्ष्मीकांत कौठकर, शेतकरी, अडगाव, जि. अकोला
जमीन मशागत, पेरणी, फवारणी, आंतरमशागत आणि मळणीकरिता ट्रॅक्टरचलित यंत्राचा वापर होतो आहे. सोयाबीन कापणीकरिता हार्वेस्टर, पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन, पाण्याची मोटार चालू अथवा बंद करण्यासाठी आॅटोस्विच आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मोबाईल तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचा शेती नियोजनात वापर महत्त्वाचा ठरत आहे. यापुढे सरकारने यांत्रिकीकरणासाठी अनुदान देताना स्थानिक उद्योजकाचा विचार करावा. कारण कोळपणी, मळणीसाठीची यंत्रे, अवजारे स्थानिक पातळीवरसुद्धा बनवून मिळतात. येणारा काळ हा अधिक प्रभावी उपकरणांद्वारे व कमीत कमी प्रदूषण करणाऱ्या यंत्रांचा असणार आहे.
- स्वप्नील कोकाटे, हळद उत्पादक, शिर्ला, ता. पातूर, जि. अकोला
|